Tehsildar Amrita Singh Tomar | मध्य प्रदेशमधील (Madhya Pradesh) ग्वाल्हेरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ‘कौन बनेगा करोडपती’ (Kaun Banega Crorepati) या शोमध्ये सहभाग घेऊन महिला तहसीलदार अमृता सिंह तोमर (Amrita Singh Tomar) चांगल्याच प्रसिद्ध झाल्या होत्या. या शोमध्ये त्यांनी 50 लाख रूपये जिंकत मोठी प्रसिद्धी मिळवली होती. तर आता अमृता सिंह तोमर या अडचणीत सापडल्या असून त्यांना कोट्यावधी रूपयांच्या घोटाळ्याच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केली आहे.
हेही वाचा – “राजकारण संपल्यानंतर मी…”, पंकजा मुंडेंचं खळबळजनक वक्तव्य, केलं मोठं भावनिक आवाहन
नेमकं प्रकरण काय?
2021 मध्ये बडोदा तहसीलमध्ये आलेल्या पुरामुळे मोठे नुकसान झाले होते. यापार्श्वभूमीवर शासनाने तेथील नागरिकांना 2.5 कोटी रुपयांचा मदत निधी जाहीर केला होता. तर पूरग्रस्तांना वाटप करण्यात येणाऱ्या 2.5 कोटी रुपयांच्या निधीमध्ये गैरव्यवहार करत मोठी अफरातफर केल्याचा आरोप अमृता सिंह तोमर यांच्यावर करण्यात आला आहे.
या प्रकरणातील चौकशीदरम्यान अमृता सिंह तोमर यांचं नाव समोर आलं होतं. त्यानंतर पोलिसांनी तपास करत कडक कारवाई केली आणि अमृता सिंह तोमर यांना अटक केली. पोलिसांनी बेड्या ठोकल्यानंतर अमृता तोमर यांनी अटक टाळण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत उच्च न्यायालयाने आणि सर्वोच्च न्यायालयाने तोमर यांचा अर्ज फेटाळून लावला.
जामीन नाकारल्यानंतर बेपत्ता होत्या अमृता तोमर, पोलिसांनी कसा घेतला शोध?
न्यायालयाने जामीन नाकारल्यानंतर अमृता तोमर या काही दिवस बेपत्ता होत्या. तर पोलिसांनी त्यांचा शोध घेऊन सापळा रचत त्यांना अटक केली. पोलीस पथकाने पोलीस अधिक्षक सुधीर कुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक मदतीने तोमर यांचा शोध घेत त्यांना चंद्रावदनी नाका येथील त्यांच्या घरातून अटक केली आहे. अमृता तोमर या विजयपूरमध्ये तहसीलदार म्हणून कार्यरत होत्या. मात्र, अटकेनंतर त्यांना या पदावरून हटवण्यात आले आहे.
दरम्यान, अमृता तोमर यांनी केबीसी शोमध्ये 50 लाख रूपये जिंकले होते. या शोनंतर त्या एक सेलिब्रिटी तहसीलदार म्हणून ओळखल्या जात होत्या. अशातच आता त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आला असून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.











