भारत आणि दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघातील पहिला कसोटी सामना कोलकाता येथील ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळवण्यात आला. या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं भारताचा 30 धावांनी पराभव केला. गेल्या 15 वर्षांत पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिकेनं भारतात कसोटी सामना जिंकला. दक्षिण आफ्रिकेनं भारतात शेवटचा कसोटी सामना 2010 मध्ये जिंकला होता. नागपूरमध्ये दक्षिण आफ्रिकेनं तो कसोटी सामना एक डाव आणि 6 धावांनी जिंकला होता. मात्र, त्यानंतर दक्षिण आफ्रिकेनं भारतात एकही कसोटी सामना जिंकलेला नव्हता. मात्र, यावेळी भारत दौऱ्यात जागतिक क्रिकेट परिषदेचे (WTC) विजेतेपद पटकावणाऱ्या दक्षिण आफ्रिकेनं ही परंपरा मोडली.
दक्षिण आफ्रिकेची नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी
कोलकाता इथं खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावात दक्षिण आफ्रिका 159 धावांवर ऑलआउट झाली. दक्षिण आफ्रिकेकडून एडेन मार्करामनं सर्वाधिक 31 धावा केल्या. भारताकडून जसप्रीत बुमराहनं सर्वाधिक पाच तर मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादवनं प्रत्येकी दोन बळी घेतले आणि अक्षर पटेलनंही एक बळी घेतला.
हेही वाचा – IPL 2026 : 10 संघांकडून 173 खेळाडू रिटेन तर 71 रिलिज; वाचा सविस्तर यादी
टीम इंडियाचा पहिल्या डावात 189 धावांत खुर्दा
प्रत्युत्तरात पहिल्या डावात टीम इंडिया 189 धावांवर ऑलआउट झाली. टीम इंडियानं खराब फलंदाजी केली. भारतीय संघाला किमान 300 धावा करुन काही धावांची आघाडी घेण्याची संधी होती. मात्र, यजमान संघ हे साध्य करण्यात अपयशी ठरला. भारताकडून केएल राहुलनं सर्वाधिक 39 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून सायमन हार्मरनं चार बळी घेतले, तर मार्को जॅन्सननं तीन बळी घेतले. केशव महाराज आणि कॉर्बिन बॉश यांनीही प्रत्येकी एक बळी घेतला.
Spinners script South Africa’s first Test win in India since 2010 ⚡#INDvSA 📝: https://t.co/fexthP5RGW pic.twitter.com/Ts9TESNmyE
— ICC (@ICC) November 16, 2025
दक्षिण आफ्रिकेची 123 धावांची आघाडी
दुसऱ्या डावात भारताला 30 धावांची आघाडी मिळाली. ती आघाडी गमावल्यानंतर दक्षिण आफ्रिका दुसऱ्या डावात 153 धावांवर ऑलआउट झाली. टेम्बा बावुमानं कर्णधाराची खेळी केली आणि संघासाठी सर्वाधिक 55 धावा केल्या. तो ड्रेसिंग रुममध्ये नाबाद परतला. त्याच्या खेळीमुळं दक्षिण आफ्रिकेला भारतासमोर 124 धावांचं लक्ष्य ठेवण्यात यश आलं. दुसऱ्या डावात भारताकडून रवींद्र जडेजानं चार बळी घेतले. मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. तर जसप्रीत बुमराह आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
टीम इंडियाला करता आल्या 93 धावा
124 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघ फक्त 93 धावांवर ऑलआउट झाला आणि 30 धावांनी सामना गमावला. कर्णधार शुभमन गिल आधीच सामन्यातून बाहेर पडला होता, त्यामुळं तो फलंदाजीसाठी उपलब्ध नव्हता. भारताचा फलंदाजी क्रम पूर्णपणे खराब झाला. वॉशिंग्टन सुंदर (31), रवींद्र जडेजा (18) आणि अक्षर पटेल (26) वगळता सर्वांनी हार मानली. दक्षिण आफ्रिकेकडून सायमन हार्मरनं पुन्हा चार बळी घेतले. केशव महाराज आणि मार्को जानसेन यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. तर एडेन मार्करामनंही एक बळी घेतला. मालिकेतील दुसरा सामना 22 नोव्हेंबरपासून गुवाहाटी इथं खेळवला जाईल.












