inflation of india: इराण-इस्राईल व अमेरिकेच्या युद्धामुळे (Iran–Israel–US War) क्रूड ऑइल (Crude Oil) आणि नैसर्गिक वायूच्या किमती वाढल्या आहेत आणि भारतातील त्यांचा पुरवठा प्रभावित झाला आहे. त्यामुळे युद्धाच्या झळा भारतालाही पोळून काढू शकतात. या युद्धाचा परिणाम महागाईवर (inflation) होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आधीच त्रस्त झालेल्या नागरिकांचे महागाईने कंबरडे मोडणार आहे.
हे ही वाचा: “भविष्यात सत्ता हाती घेणारच…”, राजकीय रणशिंग फुंकत पाडवा मेळाव्यात राज ठाकरेंचं मोठं वक्तव्य
नैसर्गिक वायूच्या किमती वाढल्या
पश्चिम आशियातील युद्धामुळे क्रूड ऑइल आणि नैसर्गिक वायूच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्याचा परिणाम भारतातही जाणवू लागला आहे.जानेवारीमध्ये प्रति बॅरल ६५-६६ डॉलर असलेले कच्चे तेल आता १०० डॉलरच्या वर गेले आहे. भारत आपल्या गरजेपैकी सुमारे ८८ टक्के कच्चे तेल आयात करतो आणि त्यापैकी जवळपास अर्धा भाग होर्मुज सामुद्रधुनीतून येतो. भारताच्या LNG आयातीपैकी सुमारे ६० हिस्सा कतार आणि युएई सारख्या देशांतून होर्मुज सामुद्रधुनीमार्गे येतो. LPG संदर्भात आव्हान अधिक मोठे आहे, कारण भारत आपल्या गरजेपैकी सुमारे ६० टक्के LPG आयात करतो आणि त्यापैकी सुमारे ९० टक्के पुरवठा होर्मुज सामुद्रधुनीतून येतो.
रुपया घसरणार?
क्रूड पुरवठा आणि पेट्रोल-डिझेलच्या बाबतीत सध्या मोठी अडचण नाही, कारण रशियाकडून अधिक प्रमाणात कच्चे तेल खरेदी होत आहे आणि पेट्रोलियम उत्पादनांचा चौथा सर्वात मोठा निर्यातदार असलेल्या भारतात सध्या टंचाई नाही. मात्र, रशियन तेल पूर्वीसारखे स्वस्त राहिलेले नाही; सध्याच्या संकटामुळे त्याचे दरही वाढले आहेत. जर पुढील १०-१२ महिन्यांत कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल ११०-११५ डॉलर दरम्यान राहिली, तर भारताचा आयात खर्च सुमारे ६५ अब्ज डॉलरने वाढू शकतो. यामुळे भारताला अधिक डॉलर खर्च करावे लागतील, रुपयाची किंमत घसरेल आणि आयात महाग होईल. परिणामी, देशात तयार होणाऱ्या वस्तूंच्या किमतीही वाढतील. एकूणच महागाई वाढण्याचा धोका स्पष्ट दिसत आहे.
पेट्रोकेमिकल क्षेत्रांवर गंभीर परिणाम
पश्चिम आशियातील युद्धाशी संबंधित दुसरा मोठा मुद्दा म्हणजे खतांचा आहे. भारत जितके खत आयात करतो, त्यापैकी सुमारे २६.२ टाक्के हिस्सा पश्चिम आशियातून येतो. वित्त मंत्रालयानेही चिंता व्यक्त केली आहे की युद्ध लांबल्यास LNG आणि क्रूडवर अवलंबून असलेल्या खत आणि पेट्रोकेमिकल क्षेत्रांवर गंभीर परिणाम होऊ शकतो. सरकारने LPG सिलिंडरचे दर आधीच वाढवले आहेत. तर पेट्रोल-डिझेलचे दरही वाढू शकतात, अशी भीती व्यक्त जात आहे.
लोकांनी जगायचे कसे?
युद्धामुळे इंधनाच्या किंमती वाढल्या आहेत. त्याचा फटका वाहतूकदारांना बसू शकतो. त्याच बरोबर देशात फळे-भाजीपाल्याचे दरही वाढू शकतात. एवढेच नाही तर आधीच महागाईने त्रस्त झालेल्या लोकांसमोर जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या महागाईवर केंद्र सरकारने उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. कारण आज लोकांसमोर जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.












