Ashok Kharat Case | नाशिकमधील (Nashik) ढोंगीबाबा अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणाने संपूर्ण राज्याला हादरवून सोडले आहे. अशोक खरातने अनेक महिलांची, तरूणींची फसवणूक करत त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेनं सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. तर या प्रकरणात आता राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांचं नाव घेतलं जात आहे. खरात प्रकरणावरून रूपाली चाकणकरांवर गंभीर आरोप केले जात आहेत.
हेही वाचा – ‘KBC’ मध्ये 50 लाख जिंकून प्रसिद्ध झालेली महिला तहसीलदार अटकेत; नेमकं काय आहे प्रकरण?
रूपाली चाकणकरांबाबत काय म्हणाल्या रूपाली ठोंबरे?
खरात प्रकरणाचा खुलासा झाल्यानंतर रूपाली चाकणकरांचे अशोक खरातसोबतचे काही फोटो व्हायरल झाले होते. तर रूपाली चाकणकर आणि अशोक खरात यांच्या कुटुंबियांचे जवळचे संबंध असल्याचं म्हटलं जात आहे. यापार्श्वभूमीवर चाकणकरांवर गंभीर आरोप केले जात आहेत. यामध्ये आता चाकणकरांवर रूपाली ठोंबरे (Rupali Thombre) यांनी निशाणा साधला आहे.
रूपाली ठोंबरे म्हणाल्या की, महिलांना खरातकडे पाठवणे ही भयानक गोष्ट आहे. जेव्हा राज्य महिला आयोगाकडे पीडित महिला आपल्या समस्या घेऊन जात होत्या तेव्हा त्यांना तुमच्या पत्रिकेतील ग्रह चेक करून घ्या, बाबा आहेत, असं सांगितलं जात होतं. अशाप्रकारे हे प्रकरण वर्ग केलं जात होतं. रूपाली चाकणकरांना अटक झाली पाहिजे. जरी नाशिक पोलिसांनी खरात प्रकरण एसआयटीकडे दिलं असलं तरी आम्ही देखील कायदेशीर निवेदन दिलेले आहे.
जे लोक पुणे शहरात आले होते ते सामाजिक कार्यकर्त्यांना भेटले होते. मग ते प्रकरण का दाबलं गेले? यामध्ये किती आर्थिक देवाण-घेवाण झाली. या गोष्टी समोर येणं गरजेचं आहे. अशोक खरातच प्रकरण समोर आल्यापासून मला सतत पीडित महिलांचे फोन येत आहेत. पण या महिलांची नावे समोर न येणं हे महत्त्वाचं आहे, असं रूपाली ठोंबरे म्हणाल्या.
ते रॅकेट रूपाली चाकणकर चालवत होत्या?
पुढे त्या म्हणाल्या की, हे रॅकेट रूपाली चाकणकर चालवत होत्या का? या प्रकरणात जे पुरावे आता समोर आले आहेत त्यानुसार रूपाली चाकणकर या हे रॅकेट चालवत आहेत हे प्रथमदर्शनी दिसत आहे. भोंदूबाबा खरात प्रकरण सीपी साहेब यांच्या कार्यक्षेत्रात येत नाही, त्यामुळे ते माहिती देऊ शकत नाहीत. मात्र, तेजस्विनी सातपुते या प्रकरणाची माहिती देऊ शकतात. असं रूपाली ठोंबरे म्हणाल्या. तसेच चाकणकरांची चौकशी अजूनपर्यंत काल झाली नाही? असा सवालही ठोंबरेंनी उपस्थित केला आहे.
महाराष्ट्रातील महिलांची बदनामी केली जात आहे. रोज एका महिलेचा व्हिडीओ समोर येत आहे. या व्हिडीओमुळे महाराष्ट्रातील कुटुंबे हादरली आहेत. ज्या महिलांना मूल होत नव्हते त्या महिला तिथे गेल्या होत्या. आता त्या महिलांना मूल झालं आहे. पण आता भोंदूबाबा खरातचे प्रकरण समोर आल्यानंतर या महिलांचा कौटुंबिक वाद विकोपाला गेला आहे. त्यांच्या डीएनए टेस्ट केल्या जात आहे. अनेक कुटुंब बरबाद होताना दिसत आहेत. या सगळ्याला भोंदूबाबा अशोक खरात आणि रूपाली चाकणकर जबाबदार आहेत, असंही रूपाली ठोंबरे म्हणाल्या.












