मुंबई महापालिकेची निवडणूक जिंकण्यासाठी सध्या राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी वेगवेगळे डाव खेळायला सुरूवात केली आहे. सत्ताधारी महायुतीमधील तिन्ही पक्ष ही निवडणूक एकत्र लढण्याच्या तयारीत आहेत. मात्र, विरोधी बाकावर असलेल्या महाविकास आघाडीतील मतभेत मात्र काही केल्या थांबायचे नाव घेताना दिसत नाहीत. त्यातच काँग्रेसने वेगळी चूल मांडली आहे. तर ठाकरे बंधू एकत्र लाढणार असल्याचे चिन्ह दिसत आहेत. असे असतानाच आता ठाकरे गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांच्या एका ट्विटने खळबळ उडवून दिली आहे. त्यांनी काँग्रेसला चांगलेच सुनावले असून काहीही झालं तर ठाकरे गट आणि मनसे हे एकत्रच लढतील, असंच सूचित केलं आहे.
मुंबई महापालिकेची निवडणूकीत महाविकास आघाडीमध्ये कोण एकत्र येणार आणि कोण वेगळी चूल मांडणार हे अद्याप समजू शकलेले नाही. काँग्रेस पक्षाने तर मनसे सोबत असेल तर आम्ही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत युती करणार नाही, असे जाहीरपणे बोलून दाखवलेले आहे. तर इकडे मनसेने देखील काँग्रेससोबत जाण्यास नकारात्मक भूमिका घेतली आहे.
हेही वाचा – उलटी गिनती शुरू? ठाकरेंनी डाव टाकला, भाजपचा मोठा नेता गळाला लावला
संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
खासदार संजय राऊत प्रकृती बिघडल्याने सध्या सार्वजनिक ठिकाणी दिसत नाहीत. त्यांना डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिलेला आहे. असे असले तरी राज्यातील राजकारणात काय-काय घडतंय, याकडे त्यांचं बारिक लक्ष आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मनसे सोबत असेल तर आम्ही ठाकरेंशी युती करणार नाही, असे काँग्रेसने जाहीर केल्यानंतर आता संजय राऊत सक्रीय झाले आहेत. त्यांनी त्यांच्या एक्स खात्यावर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी ठाकरे गटाची भूमिका थेट सांगून टाकली आहे. दिल्लीतून आदेश आल्याशिवाय मनसे पक्षाला आघाडीत घेणार नाही, असे मुंबई काँग्रेसचे मत आहे. हा काँग्रेस पक्षाचा व्यक्तिगत निर्णय असू शकतो. पण शिवसेना आणि मनसे आधीच एकत्र आले आहेत. लोकांची हीच इच्छा आहे, असे संजय राऊत यांनी थेटपणे सांगून टाकले आहे.
दिल्लीतून आदेश आल्याशिवाय
म न से ला आघाडीत घेणार नाही: मुंबई कांग्रेस
हा कांग्रेस चा व्यक्तिगत निर्णय असू शकतो
शिवसेना आणि म न से आधीच एकत्र आले आहेत,ही लोकेच्छा आहे
त्यासाठी कुणाच्या आदेश किंवा परवानगीची गरज नाही
श्री शरद पवार आणि डावे पक्ष सुद्धा एकत्र आहेत
मुंबई वाचवा! pic.twitter.com/kwDg49jJjy— Sanjay Raut (@rautsanjay61) November 22, 2025
मुळात काँग्रेस पक्ष हा अमिबा सारखा आहे, पाय आहेत पण मेंदू नाही
मनसेने देखील आपला बाणा दाखवायला सुरूवात केली आहे. मुळात काँग्रेस पक्ष हा अमिबा सारखा आहे. इकडे पाय, तिकडे पाय, सगळीकडे पाय आहे, एक पाय इथे चालतो एक पाय तिथे चालतो. मुळात मेंदू त्यांच्याकडे कोणाकडे आहे. म्हणजे निर्णायक क्षमता मुळात या पक्षात कोणाकडेच नाही. निर्णायक क्षमता या पक्षात पायाकडे आहे की मेंदूकडे आहे. वडेट्टीवारांचा पाय म्हणतो, असं करू या, वर्षा गायकवाडांचा पाय म्हणतो तसं करू या, भाई जगतापांचा पाय आणखीन तिसरीकडेच चालतो. अस्लम शेखचा पाय चौथीकडे चालतो. मेंदू कोणाकडं आहे पाय सर्वांचेच चालतात असा घणाघात मनसे प्रवक्ते संदिप देशपांडे यांनी काँग्रेस नेत्यांवर केला आहे.
काँग्रेस नेमकी काय भूमिका घेणार?
सोबतच त्यांनी काँग्रेसला सुनावलं आहे. शिवसेना आणि मनसे आधीच एकत्र आल आहेत. त्यासाठी कुणाचा आदेश किंवा कुणाच्या परवानगीची गरज नाही, अशी रोखठोक भूमिका संजय राऊत यांनी घेतली आहे. यासह खासदार शरद पवार आणि डावे पक्षसुद्धा एकत्र आहेत. मुंबई वाचवा, असे म्हणत त्यांनी काँग्रेस पक्षानेही सोबत यावे, असे आवाहन केले आहे. दरम्यान, मनसे सोबत असल्यास ठाकरेंसोबत आघाडी करणार नाही, अशी काँग्रेसची भूमिका समोर आल्यानंतर खासदार शरद पवार यांनी मात्र काहीशी वेगळी भूमिका घेतली आहे. ठाकरे, मनसेसोबत आघाडी करण्याबाबत शरद पवार सकारात्मक असल्याचे बोलले जात आहे. असे असताना आता काँग्रेस आपल्या निर्णयात बदल करणार का? मुंबईची पालिका निवडणूक महाविकास आघाडी एकदिलाने लढणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.






