Indian Ship Nanda Devi Reached In Gujarat | सध्या अमेरिका (US), इस्त्रायल (Israel) आणि इराण (Iran) या तिन्ही देशांमध्ये मोठे युद्ध (War) सुरू आहे. या युद्धाचा फटका अनेक देशांना बसला आहे. यामध्ये भारताला (India) देखील या युद्धाचा फटका सहन करावा लागला आहे. मध्य पूर्वेतील या युद्धामुळे भारतात गॅस टंचाई मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. तर भारतातील गॅस तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर एक दिलासादायक बातमी समोर आली आहे.
हेही वाचा – अखेर शिखर बँक घोटाळा प्रकरण ‘क्लोज’? पवार कुटुंबियांना मिळाली क्लीन चिट; कोर्टाने नेमकं काय म्हटलं?
भारताचे ‘नंदा देवी’ जहाज गुजरातमध्ये दाखल
भारतीय जहाज ‘नंदा देवी’ (Nanda Devi Ship) हे गुजरातच्या वडीनार बंदरामध्ये दाखल झाले आहे. या जहाजामधून एलपीजी गॅस हस्तांतरित केला जातो. त्यामुळे भारताला मोठा दिलासा मिळाला असून आता भारतात निर्माण झालेली गॅसची टंचाई आता संपणार असल्याची चिन्हं दिसत आहेत.
नंदा देवी जहाज हे वडीनार बंदरावर दाखल झाल्यानंतर डीपीए , आयआरएसएमईचे अध्यक्ष सुशील कुमार सिंह यांनी नंदा देवी जहाजाच्या कॅप्टन आणि क्रू यांच्यासोबत संवाद साधण्यासाठी आणि त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी जहाजाला भेट दिली.
47,000 टन एलपीजी घेऊन जाणारे भारतीय ‘नंदा देवी’ जहाज आज गुजरातच्या वडीनार बंदरात दाखल झाले आहे. नंदा देवी जहाज हे दीनदयाळ पोर्ट अथॉरिटीच्या वडीनार टर्मिनलजवळ समुद्राच्या मध्यभागी दाखल झाले आहे. तर नंदा देवी जहाजावर असलेला 47,000 टन एलपीजी समुद्राच्या मध्यभागी दुसऱ्या जहाजावर हस्तांतरित केला जात आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अर्धा एलपीजी पश्चिम बंगालमधील हल्दिया बंदरावर उतरवला जाणार आहे तर उर्वरित अर्धा एलपीजी एनोर बंदरावर उतरवला जाणार आहे.
नंदा देवी जहाजाच्या मुख्य अधिकाऱ्याने सांगितले की, “होर्मुझची सामुद्रधुनी पार करण्याच्या या मोहिमेमध्ये सहभागी असलेल्या सर्वांचे मी आभार मानतो. हा उपक्रम शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, भारतीय नौदल आणि इराणी नौदल यांच्या सहकार्याने राबविण्यात आला. नंदा देवी जहाजाने आता होर्मुझची सामुद्रधुनी सुरक्षितपणे पार केली असून ते आता गुजरातमधील कांडलाच्या दिशेने जात आहे आणि मेट्रिक टनांमध्ये मोठ्या प्रमाणात एलपीजीचा पुरवठा करणार आहे. यामुळे जागतिक एलपीजी संकटात मदत होईल. आम्ही भविष्यातही एलपीजीचा पुरवठा सुरू ठेवू.”
दरम्यान,यापूर्वी नंदा देवी जहाजाच्या मुख्य अधिकाऱ्याने माहिती दिली होती की, होर्मुझची सामुद्रधुनी पार करण्यासाठी बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालय आणि भारतीय जहाजबांधणी महामंडळाने प्रक्रिया सुरू केली असून, भारतीय आणि इराणी नौदलांनी आवश्यक साहाय्य पुरवले आहे. तसेच पश्चिम आशियातील सुरू असलेल्या संघर्षामुळे निर्माण झालेल्या जागतिक संकटाच्या या काळात हे एलपीजी सिलिंडर भारतासाठी उपयुक्त ठरणार आहेत.












