शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ५ नोव्हेंबरपासून मराठवाडा दौऱ्यावर असणार आहेत. यावेळी ते थेट शेतकऱ्यांशी संवाद साधणार असून शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा ऐरणीवर मांडणार असल्याचे दिसून येत आहे. दिवाळीच्या आत सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे पैसे पैसे देण्याचे पोकळ आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं. काही हजार कोटी तिजोरीतून रिलीज केले असं ते म्हणतात, तर ते पैसे मिळाले का याबद्दल शेतकऱ्यांना विचारणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
नुसती आगपाखड करायला किंवा टीका करायला म्हणून मी मराठवाडा दौऱ्यावर जाणार नाही. परतीच्या पावसाने शेती पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं होत. त्यांना नुकसान भरपाई देण्याचं आश्वासन सरकारनं दिलं होते. नुकसानीचे पैसे शेतकऱ्यांना मिळाले पाहिजेत अशी भूमिका मांडणार असल्याचे त्यांनी सांगितलं. माध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्यातील संवाद दौऱ्याची योजना मांडली. शेतकऱ्यांना मदत मिळाली का याची पाहणी करणार असल्याचेही उद्धव ठाकरे यांनी नमूद केलं.
आज शेतकऱ्याला बाकी मदतीची गरज आहेच पण सर्वात आधी ज्यांची जमीन खरडून गेली आहे, ती पूर्ववत करण्यासाठी पहिले माती मागत आहेत. ती मातीच जर त्यांना मिळाली नसेल तर पुढच्या गोष्टी कशा होणार ? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.
हे ही वाचा – संघर्ष अटळ! राज ठाकरेंचा व्होट जिहाद, भाजप नेत्यांची ठाकरे बंधूंवर जहरी टीका
दर हेक्टरी 50 हजार रुपये मिळाले पाहिजे
वाहून गेलेल्या मातीसाठी शेतकऱ्यांना दर हेक्टरी 50 हजार रुपये मिळाले पाहिजे ही मागणी आहे, कर्जमुक्ती झालीच पाहिजे ही आग्रही मागणी आहे. इतरही अनेक मुद्दे आहेत. मी शेतकऱ्यांना जाऊन भेटणार आहे. जे पॅकेज जाहीर केलं होतं, त्यातलं तरी किती मिळालं असा सवाल शेतकऱ्यांना विचारणार असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. आम्ही शेतकऱ्यांशी प्रामाणिकपणे वागलो, तसं हे सरकार का वागत नाही? असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला.
खरडून गेलेल्या जमिनीला तीन- साडेतीन लाख
खरडून गेलेल्या जमिनीला तीन- साडेतीन लाख मनरेगातून देणार होते. दिवाळीपूर्वी त्या 3 लाखातले 1 लाख रुपये तरी शेतकऱ्याच्या खात्यात टाका, मग पुढचे पैसे नंतर द्या, अशी मागणी आम्ही काढलेल्या मोर्चादरम्यान मी केली होती. पण तेही पैसे दिलेत असं वाटत नाही. सरकार नेमकं काय करणार आहे ? आत्तापर्यंत घोषित झालेल्या पॅकेजपैकी शेतकर्याच्या हातात काय मिळालं हेही पाहणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.









