विशाखापट्टणम : आंध्र प्रदेशातील डॉ. बी.आर. आंबेडकर कोनसीमा जिल्ह्यातील एका फटाक्याच्या कारखान्यात लागलेल्या भीषण आगीत किमान सात जणांचा मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. पोलीस अधिकाऱ्यांनी या अपघाताची पुष्टी केली. एका परवानाधारक कारखान्यात काम सुरु असताना ही दुःखद घटना घडली.
काय म्हणाले पोलीस अधिकारी :
रामचंद्रपुरम उपविभागीय पोलीस अधिकारी (एसडीपीओ) बी. रघुवीर यांनी सांगितलं की, फटाक्यांमध्ये रासायनिक पदार्थ भरताना ठिणगी पडली, ज्यामुळं अनेक स्फोट झाले आणि मोठ्या प्रमाणात आग लागली ज्यामुळं फटाक्यांचा साठा जळून खाक झाला. स्फोटांमुळं संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले. पोलीस अधीक्षक (एसपी) राहुल मीणा यांनी पुष्टी केली की कारखाना परवानाधारक होता, परंतु एसडीपीओ रघुवीर यांनी धक्कादायक खुलासा केला. त्यांनी सांगितलं की, गेल्या पंधरा दिवसांत (15 दिवस) कारखान्याला दोनदा इशारा देण्यात आला होता आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना नोटिसाही बजावल्या होत्या. या इशाऱ्यांना न जुमानता, कारखान्यात काम सुरुच होते, ज्यामुळं ही मोठी दुर्घटना घडली. स्थानिक लोकांच्या तात्काळ प्रयत्नांमुळं आग आटोक्यात आली.
पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं. पंतप्रधान कार्यालयानं (पीएमओ) एक्स वर पोस्ट केले आहे की, मृतांच्या कुटुंबियांबद्दल शोक व्यक्त केला आहे आणि जखमींना लवकर बरे व्हावे अशी इच्छा आहे. तसंच आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनीही मृतांबद्दल शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना अपघातस्थळी तातडीने भेट देऊन बचाव कार्याचं निरीक्षण करण्याचे निर्देश दिले आहेत आणि बाधित कुटुंबियांना सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे.
विरोधी पक्षनेते आणि वायएसआरसीपीचे प्रमुख वाय.एस. जगन मोहन रेड्डी यांनीही या घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. त्यांनी शोकग्रस्त कुटुंबियांबद्दल शोक व्यक्त केला आहे आणि मृतांच्या कुटुंबियांना आणि जखमींना त्वरित मदत करण्याचं आवाहन सरकारला केलं आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे आणि घटनेची सविस्तर चौकशी सुरु केली आहे.