Pakistan SriLanka 2009 cricket attack : पाकिस्तानातील त्या दुर्दैवी अपघाताला 16 वर्षे उलटून गेली असली तरी, श्रीलंकेच्या क्रिकेटपटूंच्या मनात ती घटना अजूनही एक सतावणारी आठवण आहे. त्या दृश्याचा विचार करताच खेळाडू थरथर कापतात. 3 मार्च 2009, क्रिकेट इतिहासातील एक “काळा दिवस”… जेव्हा स्टेडियमवर चौकार आणि षटकारांऐवजी गोळ्यांचा वर्षाव झाला. खेळाच्या मैदानावर दहशताचं सावट पसरलं. आता काळाचं चक्र पुन्हा फिरलं आहे, श्रीलंकेचा संघ पुन्हा पाकिस्तानचा दौरा करत आहे आणि मंगळवारी पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद इथं झालेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटानंतर, 2009 मधील आठवण पुन्हा ताजी झाली आहे.
नेमकं काय घडलं होतं :
खरं तर, 2009 च्या सुरुवातीला श्रीलंकेचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर गेला होता. दोन्ही संघ दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार होते. मालिकेतील पहिला सामना 21 ते 25 फेब्रुवारी दरम्यान कराची इथं खेळवण्यात आला होता, जो अनिर्णित राहिला. दुसरा सामना 1 ते 5 मार्च दरम्यान लाहोर इथं खेळवण्यात येणार होता, परंतु या काळात श्रीलंकेच्या संघावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. श्रीलंकेचा संघ लाहोरमधील दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी हॉटेलमधून गद्दाफी स्टेडियमकडे जात असताना डझनभर मुखवटा घातलेल्या दहशतवाद्यांनी बसवर हल्ला केला. या हल्ल्यात श्रीलंकेचा कर्णधार महेला जयवर्धने, कुमार संगकारा, अजंता मेंडिस, थिलन समरवीरा, थरंगा परानविताना आणि चामिंडा वास जखमी झाले.

संघ परतला मायदेशी :
या हल्ल्यात सहा पाकिस्तानी पोलीस अधिकाऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जातं. श्रीलंकन खेळाडूंची बस मेहर मोहम्मद खलील नावाच्या ड्रायव्हरनं चालवली होती. खलीलच्या समयसुचकतेनं संपूर्ण संघाला मृत्यूपासून वाचवलं. त्यानं जोरदार गोळीबारातून अथकपणे गाडी चालवली आणि स्टेडियममध्ये पोहोचवलं. या हल्ल्यानंतर, श्रीलंकेचा संघ दौरा अर्ध्यावरच सोडून मायदेशी परतला. त्या हल्ल्यानंतर, परदेशी संघांनी जवळजवळ 10 वर्षे पाकिस्तानचा दौरा करणं टाळलं. पाकिस्तानला मध्य पूर्वेतील तटस्थ मैदानांवर त्यांच्या घरच्या मालिका खेळण्यास भाग पाडलं गेलं. अखेर डिसेंबर 2019 मध्ये श्रीलंकेच्या दौऱ्यासह आंतरराष्ट्रीय क्रिकेट पाकिस्तानमध्ये परतलं.

सध्याची परिस्थिती काय (Pakistan SriLanka 2009 cricket attack)
श्रीलंकेचा क्रिकेट संघ सध्या पाकिस्तान दौऱ्यावर आहे, जिथं दोन्ही संघ तीन सामन्यांची वनडे मालिका खेळत आहेत. मात्र, मंगळवारी (11 नोव्हेंबर) इस्लामाबादमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटानंतर, श्रीलंकेच्या संघात भीतीचं वातावरण आहे आणि अनेक खेळाडूंनी सुरक्षेच्या कारणास्तव मायदेशी परतण्याची इच्छा व्यक्त केली आहे. दरम्यान, पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं (पीसीबी) खेळाडूंच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे आणि पाकिस्तान-श्रीलंका वनडे मालिकेतील पुढील दोन सामन्यांच्या वेळापत्रकात बदल केले आहेत.












