Sunetra Pawar | सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी पहिल्यांदाच भाषण केले. यावेळी त्यांनी सरकारी महिला कर्मचाऱ्यांसाठी सरकारने आणलेल्या ‘लवकर या, लवकर जा’ या योजनेबाबत मोठी घोषणा केली. तसेच त्यांनी महिला सक्षमीकरणाचाही मुद्दा मांडला. तर आपल्या भाषणाच्या शेवटी सुनेत्रा पवार या अजित पवारांच्या (Ajit Pawar) आठवणीत भावूक झालेल्या दिसल्या.
विधान परिषदेत सुनेत्रा पवारांचं पहिलं भाषण
विधान परिषदेत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आपले पहिले भाषण सादर केले. यावेळी त्यांनी राज्य सरकारने अंमलात आणलेल्या ‘लवकर या, लवकर जा’ या योजनेसोबतच लाडकी बहीण योजना, महिलांच्या प्रसूती रजा, अंगणवाडीमधील पाण्याची समस्या आणि शक्ती कायद्याबाबतही महत्त्वाच्या घोषणा केल्या.
यावेळी सुनेत्रा पवार यांनी प्रसूती महिलांच्या रजेबाबत महत्त्वाची घोषणा केली. महिलांना 180 दिवसांची प्रसूती रजा मिळणार असल्याची घोषणा त्यांनी केली. सोबतच अंगणवाडीमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली होती. तर आता प्रत्येक अंगणवाडीमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात येणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली.
पुढे ‘लवकर या, लवकर जा’ या योजनेबाबत माहिती देताना सुनेत्रा पवार म्हणाल्या की, मुंबई महानगर क्षेत्रातील महिला कर्मचाऱ्यांसाठी सकाळी 9.15 वाजता कार्यालय सुरू होणार आहे. 9.15 ते 9.45 या दरम्यान महिला कर्मचारी कार्यालयात लवकर येऊन जितकी मिनिटे आधी कामकाज करतील तितकी मिनिटे संध्याकाळी कार्यालयातून लवकर निघण्याची, अर्थातच सुमारे 30 मिनिटांची सवलत देण्यात आली आहे , अशी माहिती सुनेत्रा पवार यांनी दिली.
‘ऑपरेशन मुस्कान’बाबत सुनेत्रा पवारांनी दिली मोठी माहिती
लाडकी बहीण योजनेमुळे राज्यातील महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या आहेत. तसेच आता राज्य सरकार लाडकी बहिण योजनेच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्नशील असल्याची माहितीही सुनेत्रा पवारांनी दिली. तसेच महिलांच्या सुरक्षेसाठी राज्य सरकार कटीबद्ध असून राज्यातील बेपत्ता तरूणींचा शोध घेण्यासाठी ऑपरेशन मुस्कान राबवले जात असल्याची माहितीही त्यांनी दिली.
अरे संसार संसार… म्हणत सुनेत्रा पवार भावूक
तर भाषणाच्या शेवटी सुनेत्रा पवार या अजित पवारांच्या आठवणीत भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी त्यांनी बहिणाबाई चौधकी यांच्या ‘अरे संसार संसार…’ या कवितेच्या ओळी म्हणत या ओळींचा अर्थ खूप खोल असल्याचं म्हणत त्या भावूक झाल्या. यादरम्यान सुनेत्रा पवार भावूक झाल्याचं पाहून आदिती तटकरे यांनाही अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं.











