MNS Padwa Melava 2026 | काल (19 मार्च) मुंबईत (Mumbai) शिवाजी पार्कवर (Shivaji Park) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाडवा मेळावा (MNS Padwa Melava) पार पडला. या मेळ्याव्यात मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आपल्या दमदार शैलीत राजकीय फटकेबाजी केली. तसेच त्यांनी सत्तेबाबत मोठा दावा देखील केला. भविष्या सत्ता आपणच हाती घेणार, असं मोठं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
हेही वाचा – गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंचा अनपेक्षित सूर; शरद पवारांचं केलं कौतुक, म्हणाले, “त्यांनी सर्वसामान्यांना…”
राज ठाकरेंनी आपल्या भाषणाची सुरूवात आपल्या खास शैलीत करत संपूर्ण जनतेला गुढीपाडव्याच्या आणि मराठी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी राज ठाकरे म्हणाले की, जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो आणि भगिनींनो, सर्वप्रथम मी तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि मराठी नववर्षाच्या मन:पूर्वक शुभेच्छा देतो. आपल्या मनसे पक्षाची स्थापना 9 मार्च 2006 साली करण्यात आली होती. तर 19 मार्च 2006 ला आपली पहिली जाहीर सभा ही याच शिवतीर्थावर पार पडली होती. आज आपल्या मनसे पक्षाला 20 वर्षे पूर्ण झाली आहेत, असं राज ठाकरेंनी सांगितलं.
पुढे ते म्हणाले की, भाग्याची आणि आनंदाची गोष्ट आहे की, 20 वर्षांनंतर बरोबर 19 मार्चलाच गुढीपाडवा आला आहे. याला मी एक शुभ संकेतच मानतो. तसेत राज्यात निवडणुका आल्या, गेल्या, रणशिंग फुंकण्यात आले हे सर्व झालं पण आपण आज जे आहोत ते महाराष्ट्रासाठी आहोत हे लक्षात ठेवा, असं राज ठाकरे म्हणाले.
बाळासाहेबांनी राज ठाकरेंना दिलेला कानमंत्र
बाळासाहेबांनी दिलेल्या कानमंत्राबाबत राज ठाकरेंनी सांगितलं. ते म्हणाले की, आज तुम्ही सगळे फुरसतीत आला आहात ना? मग सगळ्यांनी शांतपणे ऐका. ज्यावेळी मी राजकारणात आलो होतो तेव्हा मी पहिले भाषण केले होते. त्यानंतर आदरणीय बाळासाहेब ठाकरेंनी मला बोलावून घेतले आणि काही महत्त्वाची वाक्ये सांगितली होती. त्यांनी सांगितलेली ती वाक्ये माझ्या डोक्यात एखाद्या स्क्रूप्रमाणे माझ्या डोक्यात फिट बसली आहे. त्यांनी मला सांगितलं होतं की, “कधीही भाषण करताना एक गोष्ट लक्षात ठेव, तू काय बोललास यापेक्षा लोकांना तू काय विचार करायला दिलंस, याला जास्त महत्त्वा दे.” त्यामुळे कधीही भाषण करताना माझ्यावर नेहमी एक मानसिक दडपण असतं की आज मी तुम्हाला काय नवीन देऊ? असं काय सांगू ज्यामुळे तुम्हाला आणि सरकारला विचार करायला लागेल? असं राज ठाकरे म्हणाले.
मी जे आता बोलत आहे ते तुमच्या टाळ्या मिळवण्यासाठी बोलत नाहीये. महाराष्ट्राचे गतवैभव पुन्हा मिळवून देण्यासाठी मी जो शब्द तुम्हाला दिला आहे त्यासाठी भविष्यात आपण सत्ता हाती घेणारच आहे, हा माझा आत्मविश्वास आहे, असं मोठं वक्तव्य राज ठाकरेंनी केलं. राज ठाकरेंनी केलेल्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.












