नवी दिल्ली PM Narendra Modi : शुक्रवारी लोकसभेत महिला आरक्षण विधेयकावर मतदान झालं, परंतु सत्ताधारी पक्षाला दोन-तृतीयांश बहुमत मिळवता आलं नाही. विरोधी पक्षांनी विरोधात मतदान केल्यामुळं महिला आरक्षण विधेयक संसदेत मंजूर होऊ शकलं नाही. यानंतर, आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पंतप्रधानांनी विरोधी पक्षांवर नाराजी व्यक्त केली.
काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी :
2029 पासून लोकसभा आणि राज्य विधानसभांमध्ये महिलांना आरक्षण देणारं विधेयक नाकारुन विरोधी पक्षांनी मोठी चूक केली आहे, असं ते म्हणाले. पंतप्रधान मोदी म्हणाले, “देशातील महिला त्यांना माफ करणार नाहीत; विरोधी पक्षाला त्याचे परिणाम भोगावे लागतील.” सूत्रांनुसार, मंत्रिमंडळाच्या बैठकीदरम्यान पंतप्रधान मोदी म्हणाले की, विरोधी पक्षाला परिणामांना सामोरं जावं लागेल आणि महिलांना उत्तर द्यावं लागेल. ते पुढं म्हणाले, “त्यांनी देशातील महिलांची निराशा केली आहे. हा संदेश प्रत्येक व्यक्तीपर्यंत, प्रत्येक गावापर्यंत पोहोचला पाहिजे.”
लोकसभेत विधेयकाला दोन तृतीयांश बहुमत मिळवता आलं नाही :
सरकारच्या भूमिकेवरुन विरोधी पक्षांकडून तीव्र विरोध झाल्यानंतर आणि संसदेत हे महत्त्वाचं विधेयक अयशस्वी ठरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पंतप्रधान मोदींनी ही टीका केली आहे. संविधान (131 वी दुरुस्ती) विधेयकाचा उद्देश लोकसभा आणि राज्य विधानसभांमध्ये महिलांसाठी 33 टक्के जागा राखीव ठेवणं हा होता. परंतु, लोकसभेत या विधेयकाला दोन तृतीयांश बहुमत मिळवता आलं नाही. गुरुवारी सुरु झालेली आणि शुक्रवारी मध्यरात्रीपर्यंत चाललेली जोरदार चर्चा झाल्यानंतर, विधेयकाच्या बाजूनं केवळ 298 मतं पडली, तर 230 खासदारांनी त्याला विरोध केला.
पंतप्रधान मोदी म्हणाले होते आपल्या सद्सद्विवेकबुद्धीचं ऐका :
शुक्रवारी विधेयकावर मतदान होण्यापूर्वी पंतप्रधान मोदी म्हणाले होते, “देशातील महिलांच्या वतीनं मी सर्व सदस्यांना आवाहन करतो की, त्यांच्या भावना दुखावणारं कोणतंही कृत्य करु नका. देशातील लाखो महिलांचे डोळे आपल्या सर्वांवर, आपल्या हेतूंवर आणि आपल्या निर्णयांवर आहेत. कृपया नारी शक्ती वंदन कायद्यातील दुरुस्तीला पाठिंबा द्या. मी सर्व खासदारांना आवाहन करतो की, त्यांनी आपल्या माता, भगिनी, कन्या आणि पत्नी यांचं स्मरण ठेवून आपल्या सद्सद्विवेकबुद्धीचे ऐकावं.”












