नवी दिल्ली Amit Shah : शुक्रवारी लोकसभेत महिला आरक्षणासाठीचे घटनादुरुस्ती विधेयक मंजूर होऊ शकलं नाही. विधेयकावरील मतदानापूर्वी, महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचनेच्या मुद्द्यावर सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षांमध्ये जोरदार चर्चा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी विरोधी पक्षांना हे विधेयक एकमतानं मंजूर करण्याचं आवाहन केलं होतं. मात्र, विरोधी पक्षांनी विधेयकाच्या विरोधात मतदान केलं. आता, लोकसभेत महिला आरक्षण विधेयक मंजूर होऊ न शकल्यानं, गृहमंत्री अमित शाह यांनी विरोधी पक्षांना कडक इशारा दिला आहे.
हेही वाचा : महिला आरक्षणाशी संबंधित विधेयक लोकसभेत नामंजूर; सरकारला विरोधी पक्षांचा मिळाला
अमित शाह काय म्हणाले? :
गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांच्या अधिकृत हँडलवर म्हटलं, “आज लोकसभेत एक अत्यंत विचित्र दृश्य पाहायला मिळालं. काँग्रेस, टीएमसी, डीएमके आणि समाजवादी पक्षानं नारी शक्ती वंदन कायद्यासाठी आवश्यक असलेलं घटनादुरुस्ती विधेयक मंजूर होण्यापासून रोखलं. महिलांना 33% आरक्षण देणाऱ्या विधेयकाचा पराभव, त्याचा उत्सव आणि जल्लोष खरोखरच निंदनीय आणि अकल्पनीय आहे.”
‘विरोधकांना महिलांच्या रोषाला सामोरं जावं लागेल’ :
अमित शाह पुढं म्हणाले, “आता देशातील महिलांना लोकसभा आणि विधानसभेत 33% आरक्षण मिळणार नाही, जो त्यांचा हक्क होता. काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी असं करण्याची ही पहिली वेळ नाही, तर वारंवार केलं आहे. त्यांची विचारसरणी महिलांच्या किंवा देशाच्या हिताची नाही. मला त्यांना सांगायचं आहे की महिलांचा हा अपमान इथंच थांबणार नाही; तो खूप पुढं जाईल. विरोधी पक्षांना केवळ 2029 च्या लोकसभा निवडणुकीतच नव्हे, तर प्रत्येक स्तरावर, प्रत्येक निवडणुकीत आणि प्रत्येक ठिकाणी ‘महिलांच्या रोषाला’ सामोरं जावं लागेल.”
विजयाचा उत्सव तरी कसा साजरा करता येईल? :
अमित शाह म्हणाले, “देशाच्या निम्म्या लोकसंख्या असलेल्या 70 कोटी महिलांचा विश्वासघात करुन आणि त्यांचा विश्वास गमावून कोणी विजयाचा उत्सव कसा साजरा करु शकतो? विरोधी पक्षांचा हा उत्सव, अनेक दशकांपासून आपल्या हक्कांसाठी वाट पाहणाऱ्या प्रत्येक महिलेचा अपमान आहे. काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष महिलांचा किती वेळा विश्वासघात करणार? अनेकदा, विजयासारखा दिसणारा हा गर्विष्ठ आनंद म्हणजे प्रत्यक्षात त्यामागे दडलेला एक मोठा पराभव असतो, जो काही लोकांना समजत नाही.”
हा वैयक्तिक पराभव वाटतो :
दुसरीकडे, भाजपा खासदार कंगना राणावत म्हणाल्या, “सर्व मुली आणि महिलांचं मनोधैर्य खचलं आहे. मला नाही वाटत की विरोधी पक्षातील कोणी याची अपेक्षा केली असेल. मला हा वैयक्तिक पराभव वाटतो. पंतप्रधानांनी म्हटल्याप्रमाणे, आम्ही महिलांना त्यांचे हक्क मिळवून देऊ, त्यामुळे आमचा पंतप्रधान मोदींवर विश्वास आहे.”








