नवी दिल्ली CM Mamata Banerjee : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी 23 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी विजयाचा दावा करत आहेत. मात्र, मतदानाच्या केवळ एक दिवस आधी, सर्वोच्च न्यायालयानं मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना कडक शब्दांत फटकारलं आहे. सर्वोच्च न्यायालयानं तीव्र शब्दांत ताकीद देत, मुख्यमंत्री लोकशाहीला धोका निर्माण करत असल्याचंही म्हटलं आहे.
हेही वाचा : महिला आरक्षणावरून राधाकृष्ण विखेंचा रोहित पवारांवर हल्लाबोल
सर्वोच्च न्यायालय काय म्हणालं? :
पश्चिम बंगालमधील मतदानाच्या एक दिवस आधी, सर्वोच्च न्यायालयानं ममता बॅनर्जी यांना फटकारलं. सर्वोच्च न्यायालयानं तीव्र शब्दांत म्हटलं की, हा राज्य विरुद्ध केंद्र असा वाद नसून, एक व्यक्ती, म्हणजेच मुख्यमंत्री, तपासात हस्तक्षेप करुन लोकशाहीला धोका निर्माण करत असल्याचं प्रकरण आहे. सर्वोच्च न्यायालयानं पुढं म्हटले की, या देशात असा दिवस येईल जेव्हा एक मुख्यमंत्री अशा प्रकारे तपासात हस्तक्षेप करतील, याची आम्ही कधी कल्पनाही केली नव्हती. मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण व्यवस्थेला धोका निर्माण केला आहे, असे न्यायालयानं तीव्र शब्दांत म्हटलं.
ईडीनं तृणमूल काँग्रेसच्या दोन उमेदवारांना बजावलं समन्स :
दुसरीकडे, अंमलबजावणी संचालनालयानं (ईडी) देखील तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) नेत्यांविरुद्ध एक मोठं पाऊल उचललं आहे. ईडीनं टीएमसीचे प्रमुख उमेदवार सुजित बोस आणि रथिन घोष यांना 24 एप्रिल रोजी हजर राहण्यासाठी चौथं समन्स बजावलं आहे. सुजित बोस 2026 च्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत बिधाननगर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. रथिन घोष मध्यमग्राम मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.
दोन टप्प्यांत होणार मतदान :
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील 294 जागांसाठी मतदान दोन टप्प्यांत होणार आहे. पहिला टप्पा 23 एप्रिल रोजी आणि दुसरा टप्पा 29 एप्रिल रोजी पार पडेल. पहिल्या टप्प्यात 152 जागांसाठी आणि दुसऱ्या टप्प्यात 142 जागांसाठी मतदान होईल. 2026 च्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा निकाल 4 मे रोजी जाहीर होईल.






