Ayodhya Ram Mandir: अयोध्येतील श्रीराम मंदिरातील देणगी रकमेवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत मंदिरासाठी जमा झालेल्या देणगीत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला आहे.
अयोध्येतील श्रीराम मंदिरातील देणगी रकमेवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी मंदिरासाठी जमा झालेल्या देणगीत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणामुळे राजकीय वातावरण तापले असून प्रशासन आणि ट्रस्टवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
हेही वाचा: Fly-91 चा मोठा निर्णय; 20 जूनपासून सोलापूरहून दोन मार्गांवरील विमानसेवा बंद
देणगी मोजणीदरम्यान संशयास्पद प्रकार
मिळालेल्या माहितीनुसार, राम मंदिर परिसरात देणगी मोजणी सुरू असताना काही अनियमितता आढळून आल्याचे समोर आले. यानंतर सुरक्षा यंत्रणा आणि पोलिसांनी तात्काळ कारवाई करत चार जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. हे सर्वजण स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) देणगी मोजणी प्रक्रियेशी संबंधित कर्मचारी असल्याचे सांगितले जात आहे.
याशिवाय काही रक्कम परत मिळवण्यात आल्याचीही माहिती समोर आली आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र पोलिस आणि ट्रस्ट प्रशासनाने यावर अधिकृतरीत्या फारशी माहिती दिलेली नाही.
अखिलेश यादव यांचा मोठा दावा
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना अखिलेश यादव यांनी राम मंदिरासाठी जमा झालेली मोठी रक्कम गायब झाल्याचा दावा करत चौकशीची मागणी केली आहे. त्यांनी न्यायालयाने स्वतःहून या प्रकरणाची दखल घ्यावी, अशी मागणीही केली आहे.
त्यांच्या मते, भक्तांच्या भावनांना धक्का बसला असून संपूर्ण व्यवस्थेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सरकार आणि प्रशासन या प्रकरणावर मौन बाळगत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
समस्त विश्व में भगवान राम के उपासकों के लिए ये एक बेहद संवेदनशील समाचार है कि ‘राम मंदिर’ के चढ़ावे की करोड़ों की रकम गायब पायी गई है।
ये मंदिर ट्रस्ट के लिए अत्यंत शर्मनाक स्थिति है। कोई भी सफ़ाई देने के लिए सामने नहीं आना चाहता है।
न्यायालय से स्वतः संज्ञान लेने की माँग है…
— Akhilesh Yadav (@yadavakhilesh) June 7, 2026
ट्रस्टचे स्पष्टीकरण
राम मंदिर ट्रस्टच्या वतीने देण्यात आलेल्या प्रतिक्रियेत कोणताही मोठा घोटाळा झाल्याचा दावा फेटाळण्यात आला आहे. ट्रस्टच्या अधिकाऱ्यांनी सर्व प्रक्रियेवर विश्वास असल्याचे सांगितले असून, गरज भासल्यास संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासही हरकत नसल्याचे स्पष्ट केले आहे.
राजकीय वाद वाढण्याची शक्यता
या घटनेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. विरोधकांकडून पारदर्शक चौकशीची मागणी होत आहे, तर सत्ताधारी आणि संबंधित यंत्रणा सध्या तपास प्रक्रियेवर भर देत आहेत.
दरम्यान, या प्रकरणामुळे राम मंदिराशी संबंधित व्यवस्थापन आणि देणगी प्रक्रियेवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली असून पुढील तपासानंतरच नेमके सत्य समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.









