Kailas Patil and Abhijit Patil: महाराष्ट्र विधानसभेत सत्ताधारी पक्षांकडे प्रचंड बहुमत असलं, तरी विरोधी बाकांवर बसून सरकारला सातत्याने धारेवर धरणाऱ्या काही मोजक्या आमदारांची चर्चा सध्या रंगली आहे. त्यात सर्वाधिक लक्ष वेधून घेतलेली जोडी म्हणजे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार कैलास पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार अभिजित पाटील. नात्याने मामा-भाचा असलेल्या या दोघांनी पावसाळी अधिवेशनात विविध प्रश्नांवर सरकारला अडचणीत आणत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
कोण आहेत हे मामा-भाचा?
धाराशिव विधानसभा मतदारसंघाचे आमदार कैलास पाटील हे सलग दुसऱ्यांदा विधानसभेत निवडून आले आहेत. सभागृहातील नियम, कामकाज आणि संसदीय परंपरांचा त्यांना चांगला अनुभव आहे. दुसरीकडे, माढा विधानसभा मतदारसंघातून प्रथमच निवडून आलेले अभिजित पाटील यांनी पहिल्याच टर्ममध्ये अभ्यासपूर्ण मांडणी आणि आक्रमक शैलीमुळे लक्ष वेधले आहे.
राजकीयदृष्ट्या दोघे वेगवेगळ्या पक्षांचे प्रतिनिधित्व करत असले, तरी नात्याने मामा-भाचा असल्याने त्यांची जोडी सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.
अनुभव आणि अभ्यासाची सांगड :
Kailas Patil : कैलास पाटील यांनी पावसाळी अधिवेशनात शेती, पिकविमा, नुकसानभरपाई, ग्रामीण रस्ते, वीज आणि पाणी यांसारख्या विषयांवर सरकारला सातत्याने प्रश्न विचारले. त्यांच्या प्रश्नांमध्ये आकडेवारी, स्थानिक वास्तव आणि संसदीय नियमांची अचूक जाण दिसून आली. अनेकदा त्यांच्या मिश्कील शैलीतील टोलेही सभागृहात चर्चेचा विषय ठरले.
कृषीविषयक चर्चेदरम्यान त्यांनी कृषिमंत्र्यांना उद्देशून केलेली, “महाराष्ट्र तुम्हाला ‘मामा’ म्हणतो, पण महाराष्ट्राला ‘मामा’ बनवू नका,” ही टिप्पणी सभागृहात विशेष गाजली.
हेही वाचा : पेट्रोल- डिझेलच्या दारात आज काय बदल? जाणून घ्या ११ जुलै 2026 चे ताजे दर
पहिल्याच टर्ममध्ये प्रभावी ठसा :
Abhijit Patil: अभिजित पाटील हे सहकार क्षेत्रातील अनुभव घेऊन राजकारणात आले आहेत. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या नेतृत्वातून त्यांनी सहकार क्षेत्रात काम केले असून, त्याचा फायदा त्यांच्या विधानसभेतील भाषणांमध्ये दिसून येतो.
MPID कायद्यातील सुधारणा विधेयकावर त्यांनी केलेल्या अभ्यासपूर्ण भाषणाची विशेष चर्चा झाली. सहकार, ग्रामीण विकास, शेतकरी, सहकारी बँका आणि पायाभूत सुविधांसारख्या विषयांवर त्यांनी सरकारला मुद्देसूद प्रश्न विचारले. पहिल्याच कार्यकाळात दाखवलेला आत्मविश्वास आणि विषयांवरील पकड यामुळे त्यांचे कौतुक होत आहे.
सरकारची कोंडी करणारी जोडी :
कैलास पाटील ग्रामीण भागातील मूलभूत प्रश्न मांडतात, तर अभिजित पाटील सहकार आणि ग्रामविकासाशी संबंधित विषयांवर सरकारला घेरतात. दोघांची शैली वेगळी असली, तरी दोघांच्याही केंद्रस्थानी सामान्य नागरिकांचे प्रश्न असल्याचे अधिवेशनातील चर्चेत दिसून आले.
सभागृहात विरोधकांची संख्या कमी असली, तरी अभ्यासपूर्ण प्रश्न, नियमांची जाण आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा यांच्या जोरावर ही मामा-भाचाची जोडी सरकारकडून उत्तरं मिळवण्यात यशस्वी होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
चर्चेच्या केंद्रस्थानी मामा-भाचा :
Kailas Patil and Abhijit Patil: एकीकडे अनुभवी कैलास पाटील यांची संसदीय शैली, तर दुसरीकडे तरुण अभिजित पाटील यांचा अभ्यास आणि आक्रमक मांडणी या दोन्हींचा संगम विधानसभेत पाहायला मिळत आहे. त्यामुळे विरोधी बाकांवरील ही मामा-भाचाची जोडी सध्या अधिवेशनातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या जोड्यांपैकी एक ठरली आहे.
अनुभव आणि अभ्यास, विनोदी शैली आणि मुद्देसूद मांडणी, तसेच ग्रामीण प्रश्नांवरील सातत्यपूर्ण आवाज यामुळे कैलास पाटील आणि अभिजित पाटील यांची जोडी सरकारसाठी प्रभावी विरोधक म्हणून उदयास येत असल्याचे चित्र सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात पाहायला मिळत आहे.












