लवकरच महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता, मुंबई महापालिका निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महायुती की महाविकास आघाडी निवडून येणार, याकडे राजकीय वर्तुळातील उत्सुकता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या गटातून एक मोठी बातमी समोर आली आहे. भाजप आता मुंबईत सर्व घटकांना सोबत घेऊन चालण्याची रणनीती आखत असून, महापालिका निवडणुकीसाठी भाजपने तयारी सुरू केली आहे. या तयारीचा एक भाग म्हणून एक नवीन समिती स्थापन करण्यात आली असून, हाजी अरफात शेख यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
ही समिती १९ सदस्यांची असून, त्यामध्ये मुंबईतील ज्येष्ठ व सक्रिय नेते, तसेच आमदारांचा समावेश आहे. हाजी अरफात शेख हे या समितीतील एकमेव मुस्लिम प्रतिनिधी आहेत. भाजपच्या ‘सबका साथ, सबका विकास’ या धोरणाच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हाजी अरफात शेख यांना मुस्लिम बहुल भागांमध्ये संवाद व जनसंपर्क बळकट करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांची सक्रियता आणि मैदानावरील पकड लक्षात घेता ही जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
हाजी अरफात शेख यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत राज ठाकरे आणि शिवसेनेत उद्धव ठाकरे यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव आहे. त्यांचा जनसंपर्क भाजपसाठी उपयुक्त ठरणार आहे आणि त्याचमुळे त्यांना ही मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.