Alandi Sant Dnyaneshwar Palkhi 2026: ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी प्रस्थानापूर्वी आळंदीत पूरस्थिती कायम आहे. इंद्रायणी नदीचे चारही पूल सध्या पाण्याखाली, वारकऱ्यांच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याचा काही तास शिल्लक असताना आळंदीत पूरस्थिती निर्माण झाली आहे. मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली असून नदी दुथडी भरून वाहत आहे. नदीवरील चारही पूल पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत.
पाणीपातळीत काही प्रमाणात घट झाली असली तरी परिस्थिती अद्याप नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रशासनाकडून सतर्कता बाळगली जात आहे. इंद्रायणी नदीत स्नान करण्यास सध्या मनाई करण्यात आली असून भाविकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हेही वाचा: दिल्लीत अमित शाह आणि फडणवीसांची 3 तास चर्चा; बैठकीत महाराष्ट्रासाठी कोणता प्लॅन? जाणून घ्या
पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची तयारी
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी राज्यभरातून हजारो वारकरी आळंदीत दाखल झाले आहेत. मात्र, पावसामुळे निर्माण झालेल्या पुरस्थितीमुळे प्रशासनासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. (Alandi Sant Dnyaneshwar Palkhi 2026)
वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी NDRFचे पथक तैनात करण्यात आले असून नदी परिसरात विशेष खबरदारी घेतली जात आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.
इंद्रायणी नदीच्या पाणीपातळीत वाढ
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीच्या प्रवाहात मोठी वाढ झाली आहे. नदीकाठच्या काही भागांमध्ये पाणी शिरले असून काही दुकाने आणि परिसर अद्याप पाण्याखाली असल्याचे चित्र आहे.
पालखी सोहळ्यात काळात भाविकांची मोठी गर्दी होणार असल्याने प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
वारकऱ्यांसाठी मदतीचा हात
पूरस्थितीमुळे काही वारकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागला. या पार्श्वभूमीवर स्थानिक पातळीवर वारकऱ्यांसाठी मदतीची व्यवस्था करण्यात आली आहे. (Alandi Sant Dnyaneshwar Palkhi 2026)
आळंदी शहरातील काही सामाजिक कार्यकर्ते आणि संस्थांकडून भाविकांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली. अनेक वारकऱ्यांना मोफत अन्नदान करून मदतीचा हात देण्यात आला.
आळंदीत गर्दी टाळण्याचे आवाहन
पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने वारकरी आळंदीकडे निघाले आहेत. मात्र, सध्याची हवामान परिस्थिती आणि नदीतील वाढलेले पाणी लक्षात घेता प्रशासन आणि संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानकडून वारकऱ्यांना सुरक्षिततेच्या दृष्टीने आळंदीत येण्याचे नियोजन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे
भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत काही काळ गर्दी कमी ठेवण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जात आहे.
पुण्यात वाहतुकीत बदल आणि नियोजन
संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या पुणे शहरात दाखल होणार असल्याने वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत.
वारकरी आणि नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी पुणे वाहतूक पोलिसांकडून विशेष नियोजन करण्यात आले आहे. पालखी मार्गावरील वाहतूक, पर्यायी मार्ग आणि सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत नागरिकांना माहिती देण्यात आली आहे. (Alandi Sant Dnyaneshwar Palkhi 2026)
पालखी सोहळ्यावर प्रशासनाची नजर
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर आळंदीतील परिस्थितीवर प्रशासन लक्ष ठेवून आहे. पाऊस, नदीची पाणीपातळी आणि वारकऱ्यांची सुरक्षितता या तीनही बाबींना प्राधान्य देत पुढील निर्णय घेतले जाणार आहेत.






