Sanjay Raut: उद्धव ठाकरे यांच्या बैठकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा चर्चांना वेग आला आहे. आमदार फुटीच्या दाव्यांवर संजय राऊत यांनी मोठे स्पष्टीकरण दिले.
राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा ‘ऑपरेशन टायगर 3.0’ या चर्चेने वेग घेतला आहे. उद्धव ठाकरे (Sanjay Raut) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतील काही आमदार सत्ताधारी शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चादरम्यान खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत भूमिका स्पष्ट केली. आमदार फुटीच्या चर्चा फेटाळून लावत त्यांनी पक्षातील एकजूट कायम असल्याचा दावा केला. याचवेळी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्य सरकारवरही जोरदार टीका केली.
हेही वाचा: आमिर खानच्या तिसऱ्या लग्नाला राज ठाकरेंची हजेरी; व्हायरल फोटो पाहून, नेटकऱ्यांनी विचारले थेट प्रश्न
आमदार फुटीच्या चर्चांवर नेमकं काय म्हणाले राऊत?
गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे गटातील काही आमदार शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. या चर्चांना उत्तर देताना संजय राऊत म्हणाले की, पक्षात कोणतीही नाराजी नसून सर्व आमदार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काम करत आहेत.
राऊत (Sanjay Raut) यांनी सांगितले की, नुकत्याच झालेल्या आमदारांच्या बैठकीत २० पैकी १९ आमदार उपस्थित होते. परभणीचे आमदार राहुल पाटील हे जिल्हा बँकेच्या निवडणुकीमुळे बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांनी यासाठी पूर्वपरवानगी घेतली होती, असेही राऊत यांनी स्पष्ट केले.
बैठकीत काय झाली चर्चा?
राऊत यांच्या माहितीनुसार, बैठकीत उद्धव ठाकरे यांनी भाषण करण्यापेक्षा आमदारांची मते जाणून घेण्यावर भर दिला. विविध राजकीय घडामोडी, मतदार यादीही संबंधित प्रश्न तसेच राम मंदिर ट्रस्टशी संबंधित मुद्द्यांवर बैठकीत चर्चा झाली.
आमदारांनी राज्यभर जनसंपर्क आणि आंदोलनाची मोहीम अधिक तीव्र करण्याचा आग्रह धरला असून उद्धव ठाकरे यांनीही विविध जिल्ह्यांतील कार्यक्रमांना उपस्थित राहण्याची तयारी दर्शवली आहे.
राम मंदिर प्रकरणावर राज्यभर आंदोलन
संजय राऊत यांनी सांगितले की, राम मंदिर ट्रस्टशी संबंधित आर्थिक अनियमिततेच्या मुद्द्यावर पक्ष राज्यभर जनजागृती मोहीम राबविणार आहे. या आंदोलनाची सुरुवात नागपुरमधून होणार असून त्यानंतर, पुणे, नाशिक, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगरसह इतर जिल्ह्यांमध्येही आंदोलन करण्यात येणार आहे.
शिंदेंवर गंभीर आरोप
पत्रकार परिषदेदरम्यान संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्षपणे गंभीर आरोप केले. मुख्यमंत्रीपदासाठी मोठ्या प्रमाणावर राजकीय हालचाली सुरू असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच या घडामोडींमुळे सत्ताधारी पक्षातही अस्वस्थता वाढल्याचा आरोप त्यांनी केला.
सरकारच्या कामकाजावरही टीका
पावसाळ्यात विविध सार्वजनिक प्रकल्पांमध्ये निर्माण झालेल्या समस्यांचा उल्लेख करत राऊत यांनी राज्य सरकारवर टीका केली. मेट्रो, लोकल रेल्वे, विधानभवन आणि इतर ठिकाणी पावसामुळे निर्माण झालेल्या अडचणींचा दाखला देत त्यांनी प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्न उपस्थित केले.
हेही वाचा: शरद पवार-सुनेत्रा पवार एकत्र आले; राजकारण की कौटुंबिक भेट? बैठकीमागचं नेमकं कारण काय?
राम मंदिर ट्रस्टमधील बदलांवरही प्रतिक्रिया
राम मंदिर ट्रस्टमधील पदाधिकाऱ्यांमध्ये झालेल्या बदलांवर बोलताना राऊत यांनी ट्रस्टच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले. केवळ व्यक्ती बदलल्याने परिस्थितीत बदल होणार नाही, असा दावा करत त्यांनी आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी केली.
राज्यातील राजकारण पुन्हा तापणार?
ऑपरेशन टायगर 3.0 च्या चर्चेमुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. मात्र आमदार फुटीच्या चर्चांना संजय राऊत यांनी स्पष्ट शब्दांत नाकारले असून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पक्ष एकसंघ असल्याचा दावा केला आहे. आगामी काही दिवसांत या घडामोडींना कोणते नवे वळण मिळते, याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.












