Farmer suicide due to fraud : विद्यानगरी येथील एका शेतकऱ्याने फसवणूक व कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या शेतकऱ्याने एका डायरीत आत्महत्या करत असल्याचे लिहिले असून हि डायरी साफसफाई करताना निदर्शनास आली.
विद्यानगरी येथील शेतकरी खुशाल उर्फ रवी आनंदराव ढुमणे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एका डायरीत सुसाईड नोट लिहून ठेवली होती. ही डायरी तीन दिवसानंतर घरातील साफसफाई करत असताना आढळून आली. त्यानंतर रवी ढुमणे यांच्या मुलाने नयन याने वनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. फसवणूक आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून ही आत्महत्या कऱण्यात आली आहे.
हे ही वाचा : कलाकेंद्रात कामाचे आमिष दाखवून बारामतीतील तरुणीवर अंबाजोगाईत सामूहिक अत्याचार; महिलेसह चौघांवर गुन्हा दाखल
काय आहे संपूर्ण प्रकरण
मिळालेल्या माहितीनुसार, विक्रम उर्फ विक्की तुलसीदास नानवानी आणि इतर चौघांनी संगनमताने शेतीखरेदी केली होती. 2018 मध्ये मारेगाव येथील दुय्यम निबंधक कार्यालयात रवी ठुमणे यांना नेऊन कागदपत्रांवर स्वाक्षरी करून घेतली होती. परंतु त्या दस्तऐवजातील मजकूर वाचू न देता, माहिती न देता शेतावर कर्ज उचलण्यात आल्याचा आरोप आरोपींवर करण्यात आला आहे. या मजकुरात मृत शेतकऱ्याने बँकेच्या नोटिसा, कर्जाचा बोजा, उपजीविकेचा प्रश्न आणि फसवणुकीमुळे शेत दुसऱ्याला विक्री करता येत नसल्याची व्यथा डायरीत मांडण्यात आली आहे.
तसेच मृत व्यक्तीने या प्रकरणात राजकीय पाठबळ असल्याचा उल्लेखही केला आहे. कुटुंबावर न घेतलेल्या कर्जाचा भार येऊ नये आणि शेत कर्जमुक्त व्हावे, अशी शेवटची इच्छा त्यांनी नोंदवली होती. तक्रारीनुसार शेताची बाजारभावापेक्षा जास्त रक्कम कर्ज म्हणून कशी मंजूर झाली, तसेच मृत शेतकरी कधीही संबंधित बँकेत न जाता कर्ज कसे मिळाले, याबाबत संशय व्यक्त केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वणी पोलिस करीत आहेत.












