नवी मुंबई | Crime News : नवी मुंबईतील ऐरोली येथून एका धक्कादायक घटना समोर आली असून या घटनेने संपूर्ण नवी मुंबई हादरली आहे. अनुष्का शहाजी केवळे या दहावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या 16 वर्षीय विद्यार्थिनीने मुख्याध्यापकांनी केलेल्या अपमानामुळे आत्महत्या केल्याची घटना उघड झाली आहे. या प्रकरणी अनुष्का शिकत असलेल्या शाळेच्या मुख्याध्यापिका कविता देशमुख यांच्याविरोधात रबाळे पोलिस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनुष्का ही ऐरोली येथील सुषिलाबाई देशमुख विद्यालयात इयत्ता दहावीमध्ये शिक्षण घेत होती. आणि सध्या तिची परिक्षा सुरू होती. 3 ऑक्टोबर रोजी ती शाळेत परिक्षा देण्यासाठी गेली असता, त्यावेळी तिच्या बाकाखाली एक कॉपी सापडली. ती कॉपी अनुष्काची असल्याचा आरोप शिक्षकांनी केला. त्यानंतर मुख्याध्यापिका कविता देशमुख यांनी संपूर्ण वर्गासमोर अनुष्काला अपशब्द वापरून अपमानास्पद खडेबोल सुनावले. याशिवाय, झोपडपट्टीवाले असे संबोधून तिच्या परिस्थितीचा देखील अपमान केला, असा गंभीर आरोप विद्यार्थिनीच्या पालकांनी केला आहे. मुख्याधिपिकेने केलेला अपमान सहन न झाल्याने मानसिक तणावाखाली आलेल्या अनुष्काने त्याच दिवशी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास घरी आपल्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली.
हे ही वाचा :
‘पुष्पा’ स्टाईलने सागवान तस्करी, तीन राज्यांच्या सीमावर्ती भागात चाललंय तरी काय?
अनुष्काच्या मृत्यूनंतर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून कुटुंबीयांनी तात्काळ रबाळे पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली. कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीनुसार, रबाळे पोलिसांनी मुख्याध्यापिका कविता देशमुख विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाबाबत माहिती देताना रबाळे पोलिसांनी सांगितले,’विद्यार्थिनीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे आम्ही प्रकरण नोंदवले असून कुटुंबीयांनी केलेल्या आरोपानुसार विद्यार्थिनीला वर्गात अपमानास्पद वागणूक देण्यात आली होती. त्यामुळे तिने आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले’, असं पोलिसांनी सांगितले. दरम्यान, या प्रकरणाचा तपास सुरू असून सत्य परिस्थितीचा शोध घेतला जात आहे, असं ही पोलिसांच्या प्रवक्त्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
मात्र, अनुष्काच्या आत्महत्येनंतर ऐरोली परिसरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांवरील मानसिक ताण आणि अपमानाच्या घटनांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याची भावना समाजातून व्यक्त होत आहे. तसेच विद्यार्थ्यांना शाळेसारख्या ठिकाणी जर इतका मनस्ताप सहन करावा लागत असेल, तर शैक्षणिक संस्थांमध्ये आणि शिक्षकांच्या वागणुकीकडे सतर्कतेने लक्ष देणे महत्वाचे आहे.