Sanjay Raut Kharat controversy : भोंदू खरात याच्या अटकेनंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. या प्रकरणावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप करत सत्ताधाऱ्यांची चांगलीच कोंडी केली आहे. भोंदू बाबापेक्षा त्याला प्रतिष्ठा देणारे राज्यकर्ते आणि राजकारणी अधिक मोठे गुन्हेगार आहेत, अशा कडक शब्दात संजय राऊत यांनी आपला संताप व्यक्त केला.
माध्यमांशी बोलताना, राऊत यांनी खरात प्रकरणावरुन राज्य सरकारवर आणि सत्ताधारी नेत्यांवर घणाघाती आरोप केलेत. खरातच्या दरबारात हजेरी लावणाऱ्या ४० आमदार, खासदार आणि मंत्र्यांची यादी सरकारने तातडीने जाहीर करावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. संजय राऊत यांचा रोख थेट शिंदे गटातील आमदार, खासदार मंत्र्यांवर असल्याचे पाहायला मिळाले. त्यांच्या यादीत शिंदे गटातील सर्वाच नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची नावे असल्याचे दिसून येत आहेत.
राज्यकर्ते आणि राजकारणी अधिक गुन्हेगार
जर सरकार या भोंदू बाबाच्या पाठीशी नसते, तर या नेत्यांची नावे आतापर्यंत समोर आली असती. गुन्हेगारांना मदत करणाऱ्यांना ज्याप्रमाणे सह-आरोपी केलं जातं, त्याच धर्तीवर या नेत्यांचीही चौकशी व्हायला हवी. भोंदू बाबा पेक्षा त्याला प्रतिष्ठा देणारे राज्यकर्ते आणि राजकारणी अधिक गुन्हेगार असतात. भोंदू बाबा गुन्हेगार आहेच. पण त्या भोंदूबाबाच्या चरणाशी जाऊन त्याची सेवा करणारे, स्तुती करणारे त्या राज्यकर्त्यांना अधिक अपराधी मानायला हवं. त्यामुळे अशा सर्वांची यादी जाहीर व्हायला हवी, अशी मागणी संजय राऊत यांनी केली.
दीपक केसरकरांना चौकशीसाठी बोलवलं का?
तुम्ही इतर गुन्हांमध्ये सहआरोपींची नाव देता, गुन्हेगारांना मदत करणाऱ्यांची नाव देता, त्यांना चौकशीसाठी बोलवता, इथे दीपक केसरकरांना चौकशीसाठी बोलवलं का, तटकरेंना चौकशीसाठी बोलवलं का, रुपाली चाकणकरांना चौकशीसाठी बोलवलं का, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चौकशीसाठी बोलवलं का, राधाकृष्ण विखे पाटील यांना चौकशीसाठी बोलवलं का? अस संतप्त सवाल राऊत यांनी यावेळी उपस्थित केला.
चंद्रकांत पाटील यांच्यापर्यंत अशोक खरात कसा पोहोचला?
या सर्वांना एकदा विचारा की तुम्ही तिथे का गेला होतात? कोणते विधी केले? त्यातून तुम्हाला काय फायदा झाला? त्याला किती पैसे दिले? पैसे कुठून आणलेत? पोलिसांना जर प्रश्न काढण्यात अडचणी असतील, तर मी त्यांना प्रश्नावली निर्माण करुन देतो. पण सरकार जर पाठीशी नसेल तर अमित शाहांपर्यंत अशोक खरातला कोण घेऊन गेलं? चंद्रकांत पाटील यांच्यापर्यंत अशोक खरात कसा पोहोचला? असे सवालही संजय राऊतांनी केले.
भोंदू बाबा राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे कसा पोहोचला?
फोटो कोणी कोणाबरोबर काढू शकतो? असं मुख्यमंत्री म्हणतात. मी त्यांच्या मताशी सहमत आहे. तरीही माझा प्रश्न आहे की अशोक खरातसारखा भोंदू बाबा राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे कसा पोहोचला? कोणीतरी यात मध्यस्थ आहे. कोणी तरी दलाल आहे जो या सरकारमध्ये आहे. सत्तेमध्ये या भोंदू बाबाला प्रतिष्ठा देत आहे. अशोक खरात मंत्रालयात कसा पोहाचला? तो अनेक मंत्र्यांच्या कामात कसा हस्तक्षेप करत होता? याची माहिती द्या. फक्त त्याचे ते व्हिडीओ घेऊन पोलीस चाललेत. हे प्रकरण केवळ एका गुन्ह्यापुरते नसून महाराष्ट्राच्या प्रतिठेशी संबंधित आहे, असेही संजय राऊत म्हणाले.












