Fire at Beed’s Deorai project : मराठी अभिनेते सयाची शिंदे यांनी जीवाचे रान करून बीड सारख्या माळरानावर वनराई फुलवली. मात्र, शिंदे यांनी उभारलेल्या प्रकल्पाला मागील पंधरा दिवसांत दुसर्यांदा आग लागल्यानं त्यांचं स्वप्न जळून खाक झालं आहे. याच संदर्भात सयाजी शिंदे हे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर दिलीय. बीडमध्ये आधीच झाडांची संख्या कमी आहे, त्यामुळेच सह्याद्री वनराईत मोठ्या संख्येनं झाडं लावण्यात आली असून ही झाडं जाळण्याचा जाणीवपूर्वक प्रकार होत आहे. त्यावरून सयाजी शिंदे यांनी संताप व्यक्त केला असून झाडं जाळणाऱ्या माणसाला पकडण्याचा प्रयत्न केला, पण तो पळून गेला.
हेही वाचा – मुंबईत ‘सपा’मधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर, अबु आझमींची थेट पक्षाध्यक्षांकडे तक्रार
7 वर्षांपूर्वी लावलेली झाडं जाळण्यात आली
पहिल्यांदा आग लावली तेव्हा 100-150 झाडं जळाली होती, आता पुन्हा एकदा आग लावण्यात आली असून गेल्या 7 वर्षांपूर्वी लावलेली झाडं जाळण्यात आली आहेत. दिवसाढवळ्या सकाळी 11 वाजता तीन ठिकाणी आग लावण्यात आली आहे, असे सयाजी शिंदे यांनी म्हटलं आहे. तसचं आमची माणसं आणि वन विभागाचे अधिकारीही तेथे काम करत आहेत. त्यामुळे, या घटनांना आळा बसला पाहिजे, अशी आमची भूमिका आहे.
जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करणार
याबाबत आपण जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही सयाजी शिंदे यांनी म्हटलं आहे. आता पुन्हा एकदा देवराई प्रकल्प परिसरात आग लागल्याची घटना घडल्यानंतर वनविभागासह सयाजी शिंदे यांच्या बीडमधील शिष्टमंडाने देवराई प्रकल्पाची पाहणी केली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन घडलेला संपूर्ण प्रकार त्यांना सांगण्यात आला. देवराई प्रकल्प परिसरात सीसीटीव्ही लावल्यासाठी शिष्टमंडळाने प्रशासनासोबत चर्चा केलीय.
पालवन शिवारातील सह्याद्री देवराई प्रकल्पात झाडं लावण्यात आली
सयाजी शिंदे यांच्या पुढाकारातून आणि वनविभागाच्या सहकार्यातून बीडच्या पालवन शिवारातील सह्याद्री देवराई प्रकल्पात झाडं लावण्यात आली होती. या आगीनं क्षणात रौद्ररूप धारण केलं. झाडं, औषधी वनस्पतींची नासधूस आणि पक्षांचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. येथील ओसाड डोंगराला हिरवागार करण्यासाठी सयाजी शिंदे यांनी अथक परिश्रम घेतले होते.












