Gas shortage impact on temples : पश्चिम आशियातील युद्धाच्या झळा सगळीकडेच बसू लागल्या आहेत. देशात सध्या एलपीजी गॅसचा मोठा तुटवडा जाणवू लागला असून याचा थेट फटका राज्यातील अनेक मोठ्या मंदिरांच्या अन्नछत्रांना बसला आहे. काही ठिकाणी भाविकांचा प्रसाद बंद करण्याची वेळ आली असली तरी, कोल्हापुरातील महालक्ष्मी अन्नछत्राने मात्र हार मानलेली नाही. आई महालक्ष्मीला येणाऱ्या प्रत्येक भाविकाचं पोट भरलंच जावं, असा निर्धार कोल्हापूरकरांनी केलाय.
गेल्या १९ वर्षांपासून संकट विरहीत अन्नदान सुरू
कोल्हापुरात यायचं, अंबाबाईचं दर्शन घ्यायचं आणि महालक्ष्मी अन्नछत्रात जाऊन चार घास खायचे, हे जणू भक्तांचं समीकरणच तयार झालंय. गेल्या १९ वर्षांपासून कोणतीही अडचण येऊन अन्नछत्रात अन्न शिजलं नाही, असं कधीच झालेलं नाही. कोल्हापुरात दररोज चार ते पाच हजार भाविक या अन्नछत्राचा लाभ घेतात. उत्सवाच्या काळात ही संख्या सहा ते सात हजारांपर्यंत जाते. अन्नछत्रासाठी रोज चार ते पाच एलपीजी सिलिंडर लागतात. मात्र गॅस तुटवड्यामुळे आता अन्नछत्राने चुलीवर स्वयंपाक करण्याचा निर्णय घेतलाय. जास्तीत जास्त भाविकांना भोजन देता यावं यासाठी प्रसादामध्ये काही प्रमाणात बदल करून नियोजन केलं गेलंय.
राजकीय नेत्यांन कोणत्याही प्रकारची दखल नाही
खरं तर या अन्नछत्राकडून गॅस तुटवड्यासंदर्भात शासनाला आणि मोठमोठ्या राजकीय नेत्यांना देखील वारंवार कळवण्यात आलंय. मात्र अद्याप कोणत्याही प्रकारची दखल घेतली गेली नसल्यानं आज ही वेळ आली असं सांगितलं जातंय. प्राथमिक फेरीत सर्व रुग्णालयं, आश्रम, शाळांना प्राधान्य देण्यात येत असून दुसऱ्या फेरीत अन्नछत्राचा समावेश असणार असं सांगितलं जातंय.
खर्च अवाक्याच्या बाहेर – अन्नछत्र प्रशासन
या अन्नछत्रांना आता चुलीवर जेवण चालू केलंय खरं, मात्र याचा खर्च अवाक्याच्या बाहेर असल्याचं अन्नछत्र प्रशासनाकडून सांगण्यात आलंय. एलपीजी गॅसपेक्षा किमान दीडपट खर्च अधिक असल्याचं त्यांनी सांगितलं. स्वयंपाकासाठी मांडण्यात आलेल्या चुलीला किमान ३०० ते ४०० किलो लाकूड आणि डिझेल भट्टीला किमान ४० ते ५० लिटर डिझेल लागत असल्याचं त्यांनी सांगितलं. तरीही भाविकांची सेवा अखंडित ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
जिद्द आणि भक्तीमुळे अन्नदानाची सेवा अखंडित
पश्चिम आशियातील युद्धाचा परिणाम थेट कोल्हापूरच्या अन्नछत्रावर दिसतोय. तरीही कोल्हापूरकरांचा जिद्द आणि भक्ती यामुळे आई अंबाबाईची अन्नदानाची सेवा अखंडित राहिली आहे. मात्र प्रशासनाकडून तातडीने दखल घेतली गेली तरच ही सेवा दीर्घकाळ टिकू शकेल..










