हैदराबाद K Kavitha : तेलंगणाच्या राजकारणात मोठं स्थित्यंतर झालं आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री केसीआर यांची कन्या, के. कविथा यांनी शनिवारी आपला नवीन राजकीय पक्ष, तेलंगणा राष्ट्र सेना (टीआरएस) सुरु केला. हैदराबादच्या बाहेरील एका कार्यक्रमात त्यांनी नवीन पक्षाच्या स्थापनेची घोषणा केली.
हेही वाचा : “शिवाजी महाराज युद्धाने थकले होते, अन्…” बागेश्वर बरळले, शिवप्रेमी आक्रमक
कविथा बीआरएसमधून कशा वेगळ्या झाल्या? :
कविथा या के चंद्रशेखर राव यांच्या कन्या आहेत. त्या पूर्वी भारत राष्ट्र समिती (बीआरएस) शी संबंधित होत्या. सप्टेंबर 2025 मध्ये, बीआरएसच्या राजवटीत बांधलेल्या कालेश्वरम उपसा सिंचन प्रकल्पासंदर्भात, आपले वडील आणि बीआरएस अध्यक्ष के. चंद्रशेखर राव यांची प्रतिमा ‘डागाळल्याचा’ आरोप त्यांनी त्यांचे चुलत भाऊ आणि पक्षाचे नेते टी. हरीश राव आणि नातेवाईक जे. संतोष कुमार यांच्यावर केला होता. त्यानंतर कविता यांना बीआरएसमधून निलंबित करण्यात आलं. निलंबनानंतर, कविता आपल्या ‘तेलंगणा जागृती’ या संघटनेच्या माध्यमातून सामाजिक आणि सार्वजनिक विषयांवर सक्रिय राहिल्या आहेत. आता, नवीन पक्षाची स्थापना करून त्या थेट राजकीय मैदानात परतल्या आहेत.
बीआरएसचं पूर्वीचे नाव टीआरएस होतं :
हे उल्लेखनीय आहे की, त्यांच्या वडिलांचा पक्ष, बीआरएस, तेलंगणा राष्ट्र समिती (टीआरएस) म्हणूनही ओळखला जात होता, ज्याचं नाव 2022 मध्ये बदलण्यात आलं. कविथा यांनी त्याच नावानं नवीन पक्षाची स्थापना केल्यामुळं तेलंगणाच्या राजकारणात नवीन वाद आणि संघर्ष निर्माण होऊ शकतो. कविथा यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात तेलंगणा राष्ट्र समिती (आता भारत राष्ट्र समिती) मधून केली. त्या 2014 मध्ये निझामाबाद लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आल्या आणि त्यांनी संसदेत सक्रिय भूमिका बजावली. नंतर त्या राज्यसभा सदस्य झाल्या. कविता एक आक्रमक, स्पष्टवक्त्या आणि तळागाळातील नेत्या म्हणून ओळखल्या जातात, ज्यांचा राजकीय प्रभाव सातत्यानं वाढत गेला आहे.




