पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिनी भारतीय नागरिकांना एक पत्र लिहिलं आहे. त्यांनी 1949 मध्ये संविधानाचा ऐतिहासिक स्वीकार आणि देशाच्या प्रगतीतील त्याची महत्त्वाची भूमिका अधोरेखित केली. पंतप्रधान मोदींनी नागरिकांना आवाहन केलं की त्यांनी देश “विकसित भारत” च्या स्वप्नाकडे वाटचाल करत असताना त्यांच्या कर्तव्यांना प्राधान्य द्यावं.
पंतप्रधान मोदींनी त्यांच्या पत्रात आठवण करुन दिली की 2015 मध्ये सरकारनं या पवित्र दस्तऐवजाचा सन्मान करण्यासाठी 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून घोषित केला होता. त्यांनी संसद आणि संविधानाबद्दल आदराचे त्यांचं वैयक्तिक अनुभव देखील शेअर केले, ज्यामध्ये 2014 मध्ये संसदेच्या पायऱ्यांवर नतमस्तक होणं आणि 2019 मध्ये आदर म्हणून संविधान कपाळावर ठेवणं यांचा समावेश होता. त्यांनी यावर भर दिला की संविधानानं असंख्य नागरिकांना स्वप्नं पाहण्याचा आणि ती स्वप्नं पूर्ण करण्याचा अधिकार दिला आहे.
संविधान सभेच्या सदस्यांचं स्मरण
पंतप्रधान मोदींनी डॉ. राजेंद्र प्रसाद आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या संविधान सभेच्या सदस्यांना आदरांजली वाहिली, ज्यांच्या दृष्टीमुळं संविधान समृद्ध झालं. संविधानाच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त संसदेच्या विशेष अधिवेशनात आणि देशभरातील कार्यक्रमांमध्ये विक्रमी लोकसहभाग कसा दिसून आला याची आठवण त्यांनी करुन दिली.
संविधान दिवस पर मैंने देशभर के अपने परिवारजनों के नाम एक पत्र लिखा है। इसमें हमारे संविधान की महानता, जीवन में मौलिक कर्तव्यों का महत्त्व और हमें पहली बार मतदाता बनने का उत्सव क्यों मनाना चाहिए, ऐसे कई विषयों पर अपने विचार साझा किए हैं…https://t.co/6SsfdWIUsO
— Narendra Modi (@narendramodi) November 26, 2025
कर्तव्यांचं महत्त्व आणि कलम 51अ
पंतप्रधान मोदी म्हणाले की, या वर्षीचा संविधान दिन विशेष महत्त्वाचा आहे कारण तो सरदार वल्लभभाई पटेल आणि भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीशी जुळतो. ते म्हणाले की, हे आकडे आपल्याला संविधानाच्या कलम 51अ मध्ये नमूद केलेल्या आपल्या कर्तव्यांचं महत्त्व आठवून देतात. पंतप्रधानांनी महात्मा गांधींच्या या विश्वासाची आठवण करून दिली की कर्तव्यांच्या पूर्ततेतून अधिकार मिळतात. कर्तव्यांची पूर्तता हा सामाजिक आणि आर्थिक प्रगतीचा पाया आहे यावर त्यांनी भर दिला.
लोकशाही मजबूत करण्याचं आवाहन
भविष्याकडे पाहताना, पंतप्रधान मोदींनी नमूद केलं की 2049 हे वर्ष संविधान स्वीकारल्यापासून एक शतक पूर्ण करेल. ‘विकसित भारत’ बांधण्याच्या दृष्टिकोनाकडे वाटचाल करताना त्यांनी नागरिकांना त्यांच्या कर्तव्यांना प्राधान्य देण्याचं आवाहन केलं. त्यांनी मतदानाचा अधिकार वापरून लोकशाही मजबूत करण्याच्या जबाबदारीवरही भर दिला. त्यांनी शाळा आणि महाविद्यालयांनी 18 वर्षांचे झाल्यावर पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या मतदारांचा सन्मान करुन संविधान दिन साजरा करावा असं सुचवलं. आपल्या पत्राचा समारोप करताना, पंतप्रधानांनी नागरिकांना या महान देशाचे नागरिक म्हणून त्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडण्याचं वचन पुन्हा देण्याचं आवाहन केलं.












