social media: मोबाईल (mobile) आज शरीराचा एक अविभाज्य अंग बनला आहे. त्या मोबाईलमध्ये अनेक फीचर्स असतात. त्या मोबाईलमध्ये वेगवेगळ्या प्रकारे सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म आहेत. परंतु मोबाईलच्या अति वापरामुळे किशोरवयीन मुलांमध्ये teenager) धोका वाढत असल्याचा अहवाल (report) आला आहे. ‘जागतिक आनंद अहवाल २०२६’ ने (World Happiness Report 2026) आता ही चिंता अधिक गंभीर केली आहे. त्यामुळे चिंता, नैराश्य आणि घटलेले जीवन समाधान यांसारख्या समस्या झपाट्याने वाढत आहेत. परिणामी सोशल मीडिया शाप की वरदान असा सवाल निर्माण होत आहे.
हे ही वाचा: कुणी काम देता का काम ..! देश तरुणांचा; परंतु ४० टक्के पदवीधरांच्या हाताला काम नाही
तणावाची लक्षणे
किशोरवयीन मुलामुलींचा स्क्रीन टाइम वाढला आहे. त्यांच्या मानसिक आरोग्यातही घट झाली आहे. विशेषतः, जी मुले दिवसातून ५ तास किंवा त्याहून अधिक वेळ सोशल मीडियावर घालवतात, त्यांच्यामध्ये तणाव आणि नैराश्याची लक्षणे दिसून येत आहेत. सोशल मीडिया म्हणजे अशी सर्व प्लॅटफॉर्म्स जिथे वापरकर्त्यांची प्रोफाइल, सामग्रीची देवाणघेवाण आणि संवाद साधला जातो. यामध्ये फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट, टिकटॉक, यूट्यूब आणि ट्विटर यांसारख्या प्लॅटफॉर्म्सचा समावेश होतो.
मुलांच्या वर्तनावर परिणाम
अहवालानुसार, २०१० च्या सुमारास तरुणांच्या आनंदात घट होण्यास सुरुवात झाली, जेव्हा स्मार्टफोन आणि सोशल मीडियाचा वापर झपाट्याने वाढला. याच काळात मुलांचे सामाजिक जीवन हळूहळू ऑफलाइनवरून ऑनलाइनकडे वळू लागले. तज्ञांच्या मते, या बदलाचा मुलांच्या वर्तनावर, विचारांवर आणि मानसिक स्थितीवर मोठा परिणाम झाला आहे.
मानसिकदृष्ट्या कमकुवत
या समस्येचा किशोरवयीन मुलींवर अधिक परिणाम होत आहे. सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे त्यांना कमी आत्मविश्वास, शारीरिक असमाधान, चिंता आणि नैराश्य यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागण्याची शक्यता जास्त असते. अल्गोरिदमवर आधारित सामग्री, इन्फ्लुएन्सर संस्कृती आणि इतरांशी सतत तुलना करण्याची सवय मुलांना मानसिकदृष्ट्या कमकुवत बनवू शकते.










