Maharashtra TET 2026: राज्यात येत्या २८ जून रोजी शिक्षक पात्रता परीक्षा (TET) मोठ्या प्रमाणावर आयोजित करण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी प्रशासनाने कडक नियमावली जाहीर केली. चला तर जाणून घेऊयात नवीन नियम काय आहेत
राज्यात येत्या रविवारी, २८ जून २०२६ रोजी शिक्षक पात्रता परीक्षा (TET) मोठ्या प्रमाणावर आयोजित करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ४७ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा पार पडणार असून हजारो उमेदवार यात सहभागी होणार आहेत. परीक्षेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनणे कडक नियमावली जाहीर केली आहे.
हेही वाचा: 30 जूननंतर गॅस सिलेंडर बंद होणार? सरकारचा नेमका निर्णय काय? जाणून घ्या
२० मिनिटे आधी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे
अधिकाऱ्यांच्यामाहितीनुसार, परीक्षार्थीनी पेपर सुरू होण्याच्या किमान २० मिनिटे आधी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे बंधनकारक असणार आहे. निर्धारित वेळेनंतर केंद्रावर पोहोचणाऱ्या उमेद्वारांना प्रवेश दिला जाणार नाही. पेपर १ सकाळी १०:३० ते दुपारी १:०० या वेळेत होणार असून पेपर-२ दुपारी २:३० ते संध्याकाळी ५:०० या वेळेत घेतला जाईल.
राज्यात लाखोंच्या संख्येने उमेदवारांनी टीईटी परीक्षेसाठी अर्ज केला आहे. पेपर-१ हा इयत्ता १ ली ते ५ वीच्या शिक्षकांसाठी तर पेपर-२ हा इयत्ता ६ वी ते ८ वीच्या शिक्षकांसाठी आहे. काही उमेदवार दोन्ही पेपरसाठी पात्र आहेत.
परीक्षेला जाताना कोणते कागदपत्र घेऊन जावे?
परीक्षेपूर्वी उमेदवारांची काटेकोर तपासणी केली जाणार आहे. आधारसह कोणतेही एक मूळ ओळखपत्र सादर करणे अनिवार्य आहे. उमेदवारांची ओळख पटवण्यासाठी चेहरा ओळख आणि बोटांचे ठसे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने तपासले जातील. मेटल डिटेक्टरद्वारेही तपासणी केली जाणार असून परीक्षा हॉलमध्ये प्रवेशानंतर उमेदवाराचा चेहरा स्पष्ट दिसेल याची खात्री केली जाईल.
परीक्षेच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्हास्तरावर तसेच राज्य परीक्षा परिषदेच्या कार्यालयात स्वतंत्र नियंत्रण कक्ष कार्यरत राहणार आहेत, जे संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवतील.
या गोष्टी लक्षात ठेवा
दरम्यान, पावसाळी परिस्थिती आणि संभाव्य वाहतूक अडथळे लक्षात घेता उमेदवारांनी वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. कोणत्याही परिस्थितीत उशिरा येणाऱ्या उमेदवारांना प्रवेश दिला जाणार नाही, असा स्पष्ट इशाराही देण्यात आला आहे.