Unseasonal rain Maharashtra: सोलापूरसह अनेक शहरात मंगळवारी रात्री अवकाळी पावसासह वादळी वारे आणि गारपिटीचा तडाखा बसला. या अचानक बदललेल्या हवामानामुळे काढणीला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी चिंतेत आहेत.
सोलापूर जिल्ह्यात मंगळवारी रात्री अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावत वादळी वाऱ्यासह गारपिटी पडल्यामुले शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर तसेच शहरातील अनेक परिसरात अचानक वातावरणात बदल होऊन विजांचा कडकडाट, मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्याने नागरिकांची धांदल उडाली.
हेही वाचा: Daily Horoscope: आज १८ मार्च! मेष, मिथुनसह ‘या’ राशींनी राहावे सावध; वाचा तुमचं राशिभविष्य
तुळजापूर रोड, हिप्परगा, हगलूर आणि अक्कलकोट परिसरात गारांचा अक्षरशः मारा झाला. तसेच हिंगोलीच्या कळमनुरी औंढा नागनाथ डोंगरकडा,पिंपळदरी परिसरात गारपिटीमुळे काढणीला आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. विशेषतः ज्वारी, गहू, हरभरा आणि भाजीपाला पिकांना याचा मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी पिके आडवी पडल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
वादळी वाऱ्यामुळे काही भागात झाडे उन्मळून पडली असून, वीजपुरवठ्यावरही परिणाम झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अचानक आलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान, या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी स्थानिक पातळीवरून होत आहे. प्रशासनानेही परिस्थितीचा आढावा घेण्यास सुरुवात केली असून, नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली जात आहे.
यासोबतच गडचिरोलीत हवामान खात्याने राज्यातील काही भागात 17 ते 20 मार्च असे चार दिवस वादळी पावसाची शक्यता वर्तवली होती. प्रामुख्याने विदर्भात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली. गडचिरोली जिल्ह्यात 18 मार्च रोजी पहाटे 4 वाजून 40 मिनिटांनी वादळी पावसाने हजेरी लावली.
अवकाळी पावसाच्या या तडाख्यामुळे आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसमोर आणखी एक संकट उभे ठाकले आहे. त्यामुळे शासनाने लवकरात लवकर मदत जाहीर करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.












