PCMC fire safety guidelines : पिंपरी चिंचवड शहरातील वाढत्या अग्निदुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन विभागाने नागरिक, गृहनिर्माण सोसायटी आणि व्यावसायिक आस्थापनांना अग्निसुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे.
इमारतींमध्ये जिने, कॉरिडॉर, टेरेस आणि सामाईक जागांमध्ये साठवले जाणारे अडगळीचे व ज्वलनशील साहित्यामुळे आग लागण्याचा धोका असतो. त्यामुळे अशा ठिकाणी असणाऱ्या निरुपयोगी, ज्वलनशील किंवा अडथळा निर्माण करणाऱ्या साहित्याची तातडीने आणि योग्य पद्धतीने विल्हेवाट लावावी; अन्यथा ते इमारतीबाहेर सुरक्षित स्थळी ठेवावे, कारण अशा वस्तूंच्या साठवणीमुळे आग वेगाने पसरू शकते व निकष मार्ग उपलब्ध न राहिल्यामुळे व आगीमुळे धूर व उष्णता सभोवतीच्या पॅसेज मध्ये परसल्याने आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांची सुटका करणे आणि बचावकार्य करणे कठीण होते. अनेक दुर्घटनांमध्ये वेळेवर मदत न मिळाल्याने हानी होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे नागरिकांनी आपल्या इमारतीत स्वच्छता, मोकळी जागा, अडथळामुक्त मार्ग आणि योग्य अग्निसुरक्षा याकडे अधिक गांभीर्याने लक्ष द्यावे, असे आवाहन देखील अग्निशमन विभागामार्फत करण्यात आले आहे.
हे लक्षात ठेवा
• ज्वलनशील, अडथळा निर्माण करणारे किंवा अडगळीचे साहित्य तातडीने हटवावे.
• अशा साहित्याची विल्हेवाट लावणे शक्य नसल्यास ते इमारतीबाहेर सुरक्षित स्थळी ठेवावे.
• फायर एक्सिट, जिना, कॉरिडॉर, टेरेस, इलेक्ट्रिक पॅनल रूम येथे कोणत्याही प्रकारचा अडथळा ठेवू नये.
• आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना सुरक्षितपणे त्वरित बाहेर जाण्यास अडथळा निर्माण होऊ नये, याची विशेष खबरदारी घ्यावी.
सुरक्षित शहर निर्माण करण्यासाठी सर्वांचा सहभाग आवश्यक
पिंपरी चिंचवड महापालिकेचा अग्निशमन विभाग शहराच्या सुरक्षिततेसाठी नेहमीच तत्पर आहे. प्रशासनाचे प्रयत्न तेव्हाच यशस्वी ठरतात, जेव्हा नागरिक जागरूकपणे सुरक्षेच्या दृष्टिने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करतात. सुरक्षित शहर निर्माण करण्यासाठी सर्वांचा सहभाग आवश्यक आहे. जबाबदार आणि जागरूक नागरिक हे सुरक्षित शहराचे सर्वात मोठे भक्कम आधारस्तंभ आहेत. असे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त विजायकुमार खोराटे यांनी सांगितले.
हे ही वाचा : नातेपुते स्मशानभूमीत काळ्या बाहुल्या, फोटो, लिंबू, सुया नारळ मध्यरात्री चितेवर अघोरी प्रकार
मोठ्या प्रमाणावर जीवित आणि मालमत्तेची हानी टाळली जाऊ शकते
अग्निशमन विभागाचे जवान जीव धोक्यात घालून प्रत्येक आपत्कालीन परिस्थितीत आपणास मदतकार्य करण्यास तत्पर राहतात. त्यांची कामे अधिक प्रभावीपणे व शीघ्रतेने पार पडण्यासाठी शहरातील नागरिकांनी सुरक्षित, मोकळी आणि अडथळामुक्त जागा, निर्माण करणे आवश्यक आहे. वेळेवर अग्नि सुरक्षा व बचावकार्य उपलब्ध झाले तर मोठ्या प्रमाणावर जीवित आणि मालमत्तेची हानी टाळली जाऊ शकते. असे मत पिंपरी चिंचवड महापालिकेचे उपायुक्त व्यंकटेश दुर्वास यांनी व्यक्त केले.
अडगळीचे आणि निरुपयोगी साहित्य धोक्याचे कारण
अडगळीचे आणि निरुपयोगी साहित्य कोणत्याही इमारतीसाठी धोक्याचे कारण ठरू शकते. अशा वस्तूंमुळे बचावमार्ग अडवला जातो आणि आपत्कालीन परिस्थितीत सुरक्षितपणे बाहेर पडण्यासाठी लागणारा मौल्यवान वेळ कमी शिल्लक राहतो. सर्व इमारतींमधील सामाईक जागा स्वच्छ, मोकळ्या आणि अडथळामुक्त ठेवणे ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे. आपत्कालीन निकास मार्ग अडथळा विरहित असल्यास अग्निशमन जवानांना दुर्घटनास्थळी त्वरेने पोहोचता येते. असे अग्निशमन अधिकारी ऋषिकांत चिपाडे यांनी सांगितले.












