Maharashtra State Board Exam Centers Cancelled : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू होण्यापूर्वीच गैरप्रकार झालेल्या परीक्षा केंद्रांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. राज्य मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यभरातील दहावीची ३१ आणि बारावीची ७६ केंद्रांची मान्यता रद्द करण्यात आली. कारवाई करण्यात आलेली सर्वाधिक परीक्षा केंद्रे ही छत्रपती संभाजीनगर विभागातील आहेत. एकाच विभागातील ३८ परीक्षा केंद्रांचा समावेश आहे. परीक्षा काळात दहावी, बारावीच्या परीक्षेत गैरप्रकार आढळून येणाऱ्या केंद्रांवर कायमची मान्यता रद्द करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
हेही वाचा – महानगरपालिका निवडणुक: तुमच्याकडे मतदार ओळखपत्र नसेल, तर इतर कोणते ओळखपत्र दाखवून करता येईल मतदाव; पाहा यादी
दहावी आणि बारावीच्या परीक्षेत कॉपीसारखे गैरप्रकार रोखण्यासाठी कॉपीमुक्त अभियान राज्यभर राबवण्यात येते. परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांची तपासणी, भरारी पथकांच्या भेटी, बैठी केंद्रे, जिल्हास्तरीय दक्षता समितीच्या भेटी, ड्रोनद्वारे निगराणी, पोलीस बंदोबस्त, परीक्षा केंद्रांबाहेर दृकश्राव्य चित्रीकरण अशा विविध उपाययोजना करण्यात येतात. मात्र असं असताना काॅपी प्रकरणे समोर आली होती.
३४ केंद्रांवर भरारी पथकांमार्फत गैरप्रकारांची प्रकरणे
राज्य मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, दहावीच्या फेब्रुवारी-मार्च २०२५च्या परीक्षेत राज्यभरात एकूण ३४ केंद्रांवर भरारी पथकांमार्फत गैरप्रकारांची प्रकरणे आढळून आली. त्यापैकी पुणे विभागातील सात, नागपूर विभागातील सहा, छत्रपती संभाजीनगर विभागातील १०, मुंबई विभागातील एक, लातूर विभागातील सात, अशा एकूण ३१ केंद्रांची मान्यता रद्द करण्यात आली आहे. कोकण, नाशिक, कोल्हापूर, अमरावती या विभागातील एकही केंद्र नाही.












