Namo Bharat Train : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर प्रदेशातील मेरठ इथं नमो भारत ट्रेन, रॅपिड रेल आणि मेट्रोचं उद्घाटन केलं. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज उत्तर प्रदेश आणि संपूर्ण देश जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांच्या एका नवीन युगाचं साक्षीदार होत आहे. मेरठ मेट्रो, नमो भारत ट्रेन आणि प्रादेशिक जलद वाहतूक प्रणालीच्या नवीन विभागाचं उद्घाटन एनसीआरमधील लोकांचं जीवन सोपं आणि अधिक सोयीस्कर बनवेल.
उत्तर प्रदेशात हे काम झालं याबद्दल मला समाधान :
पीएम मोदी म्हणाले, “आज पहिल्यांदाच एकाच प्लॅटफॉर्मवरून नमो भारत जलद रेल आणि मेट्रो सेवा एकाच दिवशी सुरु करण्यात आल्या. विकसित भारतात कनेक्टिव्हिटी कशी असेल याची ही एक अद्भुत झलक आहे. नमो भारत सारखी आधुनिक ट्रेन अंतर्गत शहरांसाठी मेट्रो आणि जुळ्या शहरांच्या दृष्टिकोनाला गती देईल. उत्तर प्रदेशात हे काम झालं आहे याबद्दल मला समाधान आहे.”
जलद रेल महिलांच्या शक्तीचं प्रतीक :
पंतप्रधान मोदी म्हणाले, “पूर्वी, येथील संपूर्ण मार्ग संध्याकाळ होताच शांत व्हायचा. भीती आणि दहशतीचं वातावरण होतं.” आता, एकीकडे कायदा आणि सुव्यवस्था सुधारली आहे आणि दुसरीकडे, लोकांना सोयीस्कर आणि सुरक्षित प्रवासाची सुविधा मिळाली आहे. मला आनंद आहे की नमो भारत रॅपिड रेल देखील महिला शक्तीचं प्रतीक बनलं आहे. यामध्ये, आमच्या मुली बहुतेक नोकऱ्यांमध्ये कार्यरत आहेत, ज्यामध्ये ट्रेन ऑपरेटर आणि स्टेशन कंट्रोल स्टाफ यांचा समावेश आहे आणि त्या आघाडीवर आहेत.
काँग्रेस एआय समिटमध्ये घाणेरडं राजकारण :
पंतप्रधान म्हणाले की देशातील काही राजकीय पक्ष भारताचं यश पचवू शकत नाहीत. तुम्ही नुकतंच भारतात जगातील सर्वात मोठी एआय शिखर परिषद पाहिली. 80 हून अधिक देशांचं प्रतिनिधी दिल्लीत आले. जवळपास 20 देशांचे राष्ट्रप्रमुखही भारताला भेट देत होते. संपूर्ण देश अभिमानानं भरुन गेला होता. परंतु काँग्रेस आणि त्यांच्या समर्थकांनी भारतासाठी आयोजित केलेल्या या जागतिक कार्यक्रमाचं त्यांच्या घाणेरड्या आणि नग्न राजकारणाचं व्यासपीठ बनवले.
काँग्रेस वैचारिकदृष्ट्या दिवाळखोर :
ते पुढे म्हणाले, “काँग्रेस नेते परदेशी पाहुण्यांसमोर नग्न अवस्थेत परिषदेच्या ठिकाणी पोहोचले. मी काँग्रेस सदस्यांना विचारतो, देशाला माहित आहे की तुम्ही आधीच नग्न आहात, मग तुम्हाला तुमचे कपडे काढण्याची गरज का भासली? काँग्रेस नेत्यांनी तिथं जे केलं त्यावरुन देशातील सर्वात जुना पक्ष किती वैचारिकदृष्ट्या दिवाळखोर आणि पोकळ झाला आहे हे दिसून येते.
पंतप्रधानांचा काँग्रेसला सल्ला :
पंतप्रधान मोदी म्हणाले, “मी काँग्रेस नेत्यांना सांगू इच्छितो की पंतप्रधान होण्यासाठी तुम्हाला लोकांची मनं जिंकावी लागतील. फक्त संसदेत जागा मिळवून तुम्ही पंतप्रधान होऊ शकणार नाही.” पंतप्रधान मोदींनी एआय समिटमध्ये एनएसयूआयच्या कामगिरीवर टीका करणाऱ्या विरोधी नेत्यांचं कौतुकही केलं.








