Uddhav thackeray Call : बुलढाणा जिल्ह्यातील चिखला गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सार्वजनिक ठिकाणावरून हटवण्यावरून दोन गटात तुफान हाणामारी झाली. यावेळी संजीवनी वाघ या महिलेला मारहाण करण्यात आली. त्यानंतर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर लोणार तालुक्यातील चिखला गावात रात्री शिव भक्तांनी पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा उभारला आहे. आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्ष प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या घटनेत मारहाण झालेल्या संजीवनी वाघ यांना फोन करून संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली आहे. “मला आरोपीचंची नावे द्या आणि काळजी घ्या,” असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
चिखला गावात तणावाचे निर्माण वातावरण
शिवरायांच्या पुतळ्याच्या अवमानामुळे चिखला गावात तणावाचे निर्माण वातावरण तयार झाले होते. त्यानंतर आता पुन्हा शिवभक्तांनी शिवरायांचा पुतळा उभारला आहे. त्यानंतर आज मोठ्या संख्येने आज शिव भक्त चिखला गावात दाखल झाले आहेत. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. अशातच आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजीवनी वाघ यांना फोन करून संपूर्ण प्रकरणांची माहिती घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी, मला आरोपींची नावे पाठवा; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. कुठलाच आरोपी मोकाट सुटता कामा नये. गावात शांतता ठेवा असे आवाहन संजीवनी वाघ आणि गावकऱ्यांना केले आहे.
महिलांच्या अंगावरील कपडे फाडत मारहाण
संजीवनी वाघ यांनी या संपूर्ण घटनेबाबत बोलताना म्हटले होते की, सायंकाळी 4 ते 5 च्या सुमारास 200 ते 300 महिला आणि पुरुष एकत्र येऊन आमच्या गटावर हल्ला केला. सुमारे 30 ते 35 जणांनी माझ्या अंगावरील कपडे फाडत मारहाण केली. काही महिलांनी पोलिसांनाही घेराव घातला होता. या प्रकरणातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करून गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी वाघ यांनी केलीय.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना
‘तिथे काही मस्तवाल माजलेल्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केली. त्यांचा उद्देश होता की महाराजांचा पुतळा फेकून द्यायचा असं गावकऱ्यांनी आम्हाला सांगितलं. तिथे आमच्या एका जिजाऊ च्या लेकीला कपडे फाटेपर्यंत मारलं. येथील काही स्थानिक पोलिसांनी आरोपींना पळून जाण्यास मदत केली असे आम्हाला सांगण्यात आले. एवढा माज कोणाला आहे? छत्रपती शिवरायांशी एवढा राग कसा काय आहे? तिथे कोण कोण माजलेल आहे आम्हाला बघू द्या. राज्यात कायदा सुव्यवस्था राहिली नाही पाहिजे असा त्यांनी प्रयत्न केला आहे,’ अशी प्रतिक्रिया या घटनेवर बोलताना मनोज जरांगे यांनी दिलीय.












