Talathi Suicide After Marriage : बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्न होऊन अवघे १२ दिवस होत नाहीत तेच सरकारी हुद्द्यावर तलाठी म्हणून कार्यरत असलेल्या नवऱ्या मुलाने गळफास लावून स्वतःचे आयुष्य संपवले आहे. ही घटना अंबाजोगाई शहरालगत असलेल्या मोरेवाडी येथे घडली आहे. गणेश दत्तू कोळी (३०) असे मृत तरुणाचे नाव आहे. लग्न होऊन केवळ १२ दिवस होत नाहीत तेच तरुणाला आपल्या पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचे समजले.
दरम्यान, नवविवाहित तरुणाची पत्नी चोरून दुसऱ्या मुलाशी रात्रंदिवस फोनवरून बोलत असल्याचा धक्का सहन न झाल्याने तरुणाने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक माहितीमधून समोर आले आहे. मृत तरुणाच्या आईने आपल्या नवविवाहित सुनेच्या विरोधात तक्रार दाखल करत गुन्हा नोंद केला आहे. सुनेचे अनैतिक संबंधामुळे गणेशने हे पाऊल उचलल्याचा आरोप त्याच्या आईने केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास आता पोलिस करत आहेत.
लग्नानंतर सूनेचे वागणे संशयास्पद
आपला मुलगा आणि सून लग्नानंतर कुलदैवताच्या दर्शनाला गेले असताना तेथे त्याला त्याच्या पत्नीचे वागणे संशयास्पद वाटू लागले. ती कोणाशी तरी लपून फोनवर बोलत असते असे त्याच्या लक्षात आले. त्यानंतर घरात सत्यनारायणाची पूजा झाली, मात्र तरीही त्याच्या पत्नीचे वागणे बदलले नाही. तिने हे लग्न आपल्या मर्जीविरुद्ध झाल्याचे सांगत गणेशसोबत राहण्यास नकार दिला आणि ती अंबाजोगाईला निघून गेली, असे आईने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
दुसऱ्या मुलासोबत प्रेमसंबंध
गणेश कोळी २४ मे रोजी पत्नीला भेटण्यासाठी मोरेवाडी येथे आला होता. २५ मे रोजी त्याने आपल्या बहिणीला फोन करून रडत सांगितले की, पत्नीचे दुसऱ्या मुलासोबत प्रेमसंबंध असून तिने डायरीत तसे लिहून ठेवले आहे, जे त्याने वाचले आहे. यावरून त्यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर काही वेळातच गणेशने पत्नी राहत असलेल्या खोलीत गळफास घेतल्याची माहिती नातेवाइकांना मिळाल्याचे फिर्यादीत केले नमूद आहे.
राज्य राखीव पोलीस बलात भरती
गणेश हा २०२१ मध्ये राज्य राखीव पोलीस बलात पोलीस शिपाई म्हणून भरती झाला होता. त्यानंतर त्याने तलाठी परीक्षेचा अभ्यास करून २०२४ मध्ये चंद्रपूर येथे तलाठी म्हणून नियुक्ती मिळवली होती. १३ मे रोजी गणेश दत्तू कोळी याचा विवाह बीड येथील तरुणीशी मोठ्या उत्साहात पार पडला. गणेशची पत्नी ही अंबाजोगाई येथील फॉरेन्सिक विभागात कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत आहे.











