Uddhav Thackeray :NEET पेपरफुटीच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आंदोलनकर्ते विद्यार्थी, अभिजित दीपके आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या पालकांचे अभिनंदन केले आहे. हा लढा केवळ एका राजीनाम्यासाठी नसून देशातील तरुणांच्या आवाजाचा संघर्ष असल्याचे त्यांनी म्हटले.
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे म्हणाले की, “गेल्या काही दिवसांपासून देश अस्वस्थ आहे. मात्र, अभिजित दीपके आणि त्यांच्या सोबत ठामपणे उभे राहिलेल्या पालकांनी न घाबरता आपली भूमिका मांडली. या तरुणांनी देशातील भीतीच्या वातावरणातून लोकांना बाहेर काढण्याचे काम केले आहे.”
गेल्या काही वर्षांतील केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका करत उद्धव ठाकरे यांनी जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला. नोटाबंदीपासून विविध निर्णयांचा उल्लेख करत त्यांनी सरकारच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले.
हेही वाचा : धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर फडणवीस दिल्लीला रवाना; अमृता फडणवीस काय म्हणाल्या?
भीतीच्या वातावरणातून तरुणांनी देशाला बाहेर काढले” – उद्धव ठाकरे
“देशातील युवा शक्ती एकत्र आली तर ती किती मोठा बदल घडवू शकते, याची झलक या आंदोलनातून दिसून आली आहे,” असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतरही आंदोलन कायम
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावर बोलताना उद्धव ठाकरे यांनी आंदोलनाच्या इतर मागण्यांकडे लक्ष वेधले. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे की त्यांच्या खात्यात बदल करण्यात आला आहे, याबाबत अधिकृत स्पष्टता आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
आंदोलनकर्त्यांच्या अजून काही मागण्या बाकी असल्याचा दावा करत उद्धव ठाकरे म्हणाले की, केवळ एका निर्णयाने हा विषय संपणार नाही.
Uddhav Thackeray :
पोलिस कारवाईवर उद्धव ठाकरेंचे प्रश्न
आंदोलनादरम्यान झालेल्या पोलिस कारवाईवरही उद्धव ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केले. विद्यार्थ्यांवर झालेल्या कारवाईची चौकशी झाली पाहिजे आणि दोषींवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
“आंदोलनादरम्यान झालेल्या कारवाईची जबाबदारी कोण घेणार? संबंधितांवर कारवाई होणार का?” असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.
उद्याच्या मोर्चासाठी आवाहन
आगामी मोर्चाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन केले. तरुणाईच्या एकजुटीची ताकद सरकारला दाखवून देण्याची वेळ आल्याचे त्यांनी म्हटले.
दरम्यान, NEET पेपरफुटी प्रकरण, विद्यार्थ्यांच्या मागण्या आणि त्यानंतरच्या राजकीय घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.









