Kalamb Councillors BJP Entry: धाराशिवच्या कळंब नगरपरिषदेत ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाचे 10 नगरसेवक मातोश्रीवरील बैठकीला गैरहजर राहिल्यानंतर ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे चर्चा रंगली आहे.
धाराशिव जिल्ह्यातील कळंब नगरपरिषेदत राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना गटाकडून निवडून आलेले 10 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या नगरसेवकांसोबत काँग्रेसच्या एका नगरसेवकाचाही भाजपमध्ये प्रवेश होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा: पालकांचा खर्च होणार कमी! 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना मिळणार मोफत दप्तर; सरकारचा मोठा निर्णय
मातोश्रीवरील बैठकीपासून नगरसेवक दूर
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी धाराशिव जिल्ह्यातील पक्षाच्या लोकप्रतिनिधींसाठी मुंबईतील मातोश्री निवास्थानी बैठक आयोजित केली होती. या बैठकीत कळंबमधील संबंधित नगरसेवक उपस्थित राहिले नसल्याचे समोर आले. त्यानंतर त्यांच्या संभाव्य पक्षांतराच्या चर्चांना आणखी वेग आला.
मिळालेल्या माहितीनुसार, या नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश (BJP Entry) सोलापूर येथे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत होण्याची शक्यता आहे. मात्र, अधिकृत पक्षप्रवेशांतर या चर्चांवर शिक्कामोर्तब होणार आहे.
ठाकरे गटासाठी मोठा राजकीय धक्का?
कळंब नगरपरिषदेत ठाकरे गटाचे सर्व 10 नगरसेवक एकाच वेळी पक्ष बदलल्यास हा उद्धव ठाकरे यांच्या गटासाठी मोठा राजकीय धक्का ठरू शकतो. विशेष म्हणजे हे नगरसेवक आमदार कैलास पाटील यांच्या मतदारसंघातील असल्याने या संभाव्य पक्षांतराचे राजकीय महत्त्व वाढले आहे.
यापूर्वी या नगरसेवकांपैकी काहींनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच माजी मंत्री तानाजी सावंत यांची भेट घेतली होती. त्यामुळे ते शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. मात्र आता थेट भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ओमराजे निंबाळकरांच्या पक्षांतरानंतर हालचाली वाढल्या
खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील ठाकरे गटाच्या स्थानिक पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींशी संपर्क वाढल्याची चर्चा होती. त्याच पार्श्वभूमीवर कळंबमधील नगरसेवकांच्या हालचालींकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.
नगरसेवकांच्या संभाव्य पक्षांतरामुळे कळंबसह संपूर्ण धाराशिव जिल्ह्यातील राजकीय समीकरणांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
‘ऑपरेशन टायगर’ची पुन्हा चर्चा
दरम्यान, काही दिवसांपूर्वी शिंदे गटाचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी ‘ऑपरेशन टायगर’च्या पुढील टप्प्याबाबत दावा केला होता. आमदार कैलास पाटील यांचा या मोहिमेशी संबंध जोडणारे वक्तव्य त्यांनी केले होते. त्यानंतर धाराशिवच्या राजकारणात पक्षांतराच्या शक्यतांबाबत चर्चांना उधाण आले होते.
आता कळंबमधील 9 नगरसेवक भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा समोर आल्याने या राजकीय घडामोडींना आणखी महत्त्व प्राप्त झाले आहे.









