BCCI Team Announcement India T20 Squad: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) इंग्लड दौऱ्यासाठी भारतीय टी-२० संघाची घोषणा केली असून, १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीला प्रथमच संघात स्थान मिळाले आहे. श्रेयस अय्यरकडे संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले असून, या निवडीमुळे क्रिकेट वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आगामी आयर्लंड आणि इंग्लड दौऱ्यांसाठी तसेच आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय टी-२० संघाची घोषणा केली आहे. निवड समितीच्या बैठकीनंतर जाहीर करण्यात आलेल्या संघामध्ये काही महत्वाचे बदल पाहायला मिळाले असून नेतृत्वाची जबाबदारी श्रेयस अय्यर यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
हेही वाचा: कॅनमध्ये डिझेल बंदीवर उद्योगक्षेत्र आक्रमक; CAMIT ची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
दीर्घकाळानंतर टी- २० संघात पुनरागमन करणाऱ्या श्रेयस अय्यर यांना थेट कर्णधारपद देण्यात आले आहे. मधल्या फळीत स्थिरता निर्माण करण्यासोबतच नेतृत्वाची क्षमता लक्षात घेऊन निवड समितीने त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे. तिलक वर्मा यांच्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
वैभव सूर्यवंशी
संघ निवडीतील सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला तो युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी. अवघ्या १५ वर्षाच्या या क्रिकेटपटूने देशांतर्गत स्पर्धा आणि टी- २० क्रिकेटमधील प्रभावी कामगिरीच्या जोरावर राष्ट्रीय संघात स्थान मिळवले आहे. त्याच्या निवडीमुळे भारतीय क्रिकेटला भविष्यातील मोठा स्टार मिळू शकतो, अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात सुरू आहे.
टी-20 संघातील खेळाडूंची यादी
आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या संघात अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, इशान किशन, शिवम दुबे, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंग यांसारख्या अनुभवी खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. तसेच युवा वेगवान गोलंदाज प्रिन्स यादव यालाही संघात स्थान मिळाले आहे.
आशियाई क्रीडा स्पर्धेसाठीच्या संघात काही बदल करण्यात आले आहे. फिरकी गोलंदाज रवी बिश्नोई आणि वेगवान गोलंदाज हर्षित राणा यांचा समावेश करण्यात आला आहे.
Presenting #TeamIndia‘s T20I squads for the tours of England & Ireland 2026 🇮🇳#ENGvIND | #IREvIND pic.twitter.com/f84kSSAIDf
— BCCI (@BCCI) June 6, 2026
दरम्यान, भारतीय संघाचा आयर्लंड दौरा जून अखेरीस सुरू होणार असून बेलफास्ट येथे दोन टी-20 सामने खेळवले जाणार आहेत. त्यानंतर इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची टी-20 मालिका रंगणार आहे. या मालिकांमधून आगामी जागतिक स्पर्धांसाठी संघाची तयारी आणि युवा खेळाडूंची क्षमता तपासली जाणार आहे.











