Sanjay Raut: शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या एकत्रीकरणाच्या चर्चाना पुन्हा उधाण आले असताना, खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट भूमिका मांडत या प्रक्रियेवर अट घातली आहे. “एकत्र यायचं असेल, तर आधी मातोश्रीवर या आणि पश्चात्ताप व्यक्त करा, त्यानंतरच पुढील चर्चा होईल, ” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
अलीकडेच शिवसेनेच्या काही नेत्यांनी दोन्ही गटांनी एकत्र येण्याची भूमिका मांडली होती. भाजपाविरोधात एकत्र येण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले होते. मात्र, राऊत यांच्या वक्तव्यामुळे या चर्चेला नवे वळण मिळाले आहे.
हेही वाचा: खुशखबर! सोनं-चांदी स्वस्त; जाणून घ्या आजचे 10 ग्रॅमचे ताजे दर
राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर बोलताना राऊत यांनी विधान परिषद निवडणुकांबाबतही भाष्य केले. काही ठिकाणी महाविकास आघाडीने उमेदवार उभे केले असून, निवडणूक बिनविरोध होऊ नये यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. मतदान प्रक्रिया गोपनीय असल्याने निकालाच्या वेळी चित्र स्पष्ट होईल, असेही ते म्हणाले.
नाशिक निवडणुकीवरही भाष्य
नाशिकमधील राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना त्यांनी सांगितले की, स्थानिक पातळीवरील समीकरणे आणि मतांचे गणित लक्षात घेऊन काही निर्णय घेण्यात आले आहेत. उमेदवार न देण्याचा निर्णयही पक्ष नेतृत्वाच्या सल्ल्याने घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“आमचा पहिला विरोधक शिंदे गट”
याचवेळी, “आमच्या पहिला राजकीय विरोधक शिंदे गट आहे,” असे सांगत राऊत यांनी आपली भूमिका ठामपणे मांडली. तसेच राज्यातील निवडणुकांमध्ये घोडेबाजार सुरू असल्याचा आरोप करत त्यांनी या प्रक्रिया टीका केली.
एकूणच, राऊत यांच्या वक्तव्यामुळे शिवसेना एकत्रीकरणाच्या चर्चांवर काहीसा ब्रेक लागल्याचे दिसत आहे. पुढील काळात या विषयावर काय घडामोडी होतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.












