Reshma Kale withdraws LC election : मागील काही दिवसांपासून संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या विधानपरिषद निवडणुकीला (Legislative Council Election) आज अखेर अर्धविराम मिळाला आहे. नाशिक आणि जळगाव या दोन्ही विधानपरिषदेसाठी विरोधकांपेक्षा मित्रपक्षांच्या बंडखोरांनी नेत्यांना घाम फोडला होता. अखेर गोकुळ गिते (Gokul Gite) यांनी नाशिकमधून माघार घेतल्यानंतर जळगावमधून (Jalgaon LC Election) देखील रेश्मा काळेंनी (Reshma Kale) माघार घेतल्याचे सांगण्यात आले आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रात्री उशीरापर्यंत रेश्मा काळे यांची शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर अखेर त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर रेश्मा काळे यांनी महायुतीच्या उमेदवाराला आपला पाठींबा जाहीर केला आहे. त्यामुळे महायुतीतील बंडखोरीचा तिढा अखेर सुटला असून दोन्ही जागांवरील विजय आता निश्चित मानला जात आहे.
हेही वाचा – संजय राऊतांच्या ट्विटने राजकारणात खळबळ! मनसेमुळे महाविकास आघाडीत उलथापालथ होणार?
रेश्मा काळे यांच्या पक्षाचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार, त्यांनी महायुतीच्या उमेदववारांना पाठींबा देण्याचे स्पष्ट केलं आहे. मागील काही दिवसांपासून नाॅट रिचेबल असलेल्या रेश्मा काळे अखेर एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आल्या आणि त्यांनी थेट मुंबई गाठली. दोन्ही नेत्यांमध्ये काही काळ चर्चा झाली आणि चर्चेतून मार्ग सुटल्याचे सांगितले जात आहे.
नुकताच नाशिकचा तिडा सुटला होता, मात्र जळगावचा पेट कायम होता. त्यामुळे भाजप उमेदवाराची चिंता वाढली होती. जळगावात संख्याबळ हे भाजपच्या बाजूने असले तरी, मित्रपक्षातील बंडखोरीने भाजपला फडका बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. जळगावात भाजपने नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी दिली आहे. असे असताना विरोधकांच्या उमेदवाराची चर्चा होण्यापेक्षा इथे मित्रपक्षातील उमेदवाराचीच चर्चा होताना दिसली. मात्र, अखेर रेश्मा काळे यांनी बंडाचे निशाण शमवल्याने महायुती निर्धास्त झाली आहे.












