Uddhav Thackeray: राज्यातील राजकीय घडामोडींचा पुन्हा वेग आला असून ठाकरे गटातील काही खासदार वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चानी जोर धरला आहे. गेल्या काही दिवसांपासून पक्षातील काही खासदार नाराज असल्याच्या चर्चा सुरु असताना आता या विषयावर विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधत पक्षातील परिस्थितीवर भाष्य केले. शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष एकसंघ असून सर्व खासदार पक्ष नेतृत्वाच्या संपर्कात असल्याचा दावा त्यांनी केला. पक्षातील फुटीच्या चर्चा नवीन नसून अशा अफवा गेल्या अनेक महिन्यांपासून पसरवल्या जात असल्याचेही त्यांनी नमूद केले.
हेही वाचा: केंद्रीय लोकसेवा आयोगात 500 हुन अधिक पदांसाठी मोठी भरती जाहीर; वाचा अर्ज करण्याची शेवटची तारीख
अलीकडेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खासदारांची बैठक घेतली होती. या बैठकीनंतर काही खासदारांच्या भूमिकेबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली. काही खासदार स्वतंत्र गट स्थापन करण्याच्या तयारीत असल्याचे चर्चा होत असले तरी याबाबत अधिक माहिती समोर आलेली नाही.
संजय राऊत यांनी सांगितले की, पक्षातील सर्व खासदारांशी सातत्याने संपर्क ठेवला जात आहे. कोणत्याही प्रकारचा निर्णय किंवा हालचाल अधिकृतरीत्या समोर आल्याशिवाय त्यावर भाष्य करणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या चर्चांकडे सावधपणे पाहण्याची गरज असल्याचे त्यांनी सूचित केले.
दरम्यान, या घडामोडींमुळे राज्यातील राजकारणात उत्सुकता वाढली असून पुढील काही दिवसांत नेमकी परिस्थिती स्पष्ट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील राजकीय समीकरांवरही सर्वांचे लक्ष लागले आहे.










