Rajya Sabha Election: sanjay raut v/s priyanka chaturvedi : राज्यसभा निवडणुकीवेळी महाविकास आघाडीकडून ज्येष्ठ नेते शरद पवार (sharad pawar) यांचे नाव शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी सुचवले. त्यामुळे शरद पवार हे महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून पुढे आले. ते निवडूनही आले. शरद पवार यांचे नाव सुचवल्यामुळे प्रियांका चतुर्वेदी (priyanka chaturvedi) यांचे नाव आपोआप गळाले. ही राजकीय कुरघोडी लक्षात घेता प्रियांका चतुर्वेदी यांच्या मनात खदखद कायम होती. ती खदखद पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्या उपस्थितीत समोर आली. राज्यसभा उमेदवारीवरून प्रियांका चतुर्वेदी आणि संजय राऊत यांच्यात हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. मात्र असे काही घडले नसल्याचे संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
हे ही वाचा: गुड न्युज…! क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये टॉप 50 मध्ये भारतातील कुठल्या संस्थानी मिळवले स्थान..!
मातोश्री निवासस्थानी खासदारांची बैठक
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी आपल्या खासदारांची बैठक घेतली. आपले खासदार फुटणार आहेत, याची कुणकुण उद्धव ठाकरे यांना लागली होती. खासदार फुटू नयेत यासाठी ठाकरे यांनी आपल्या खासदारांशी संवाद साधला. तुम्ही फुटणार नाहीत, माझ्यावर तुमचा विश्वास आहे, असे आश्वस्त केले.
उद्धव ठाकरेंसमोरच चतुर्वेदी यांनी विचारला प्रश्न
यावेळी त्यांनी बोलताना राज्यसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेसशी झालेला संवाद व शरद पवार यांच्या उमेदवारीवरून होणार संघर्ष कसा टाळला यावर भाष्य केले. यावर प्रियांका चतुर्वेदी थेट आक्षेप घेतला. I want to protest असे म्हणत त्यांनी थेट संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. “संजय राऊत यांनी शरद पवारांचे नाव का घेतले? त्यांना तो अधिकार कोणी दिला? असा सवाल चतुर्वेदी यांनी उद्धव ठाकरेंसमोरच विचारल्याचे म्हटलं जात आहे.
निर्णय घेण्याचा अधिकार माझ्याकडे
दरम्यान, प्रियांका चतुर्वेदी यांनी राज्यसभा निवडणुकीवरून संजय राऊत यांना लक्ष केले. हे लक्षात येताच उद्धव ठाकरे यांनी या विषयावर हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. संजय राऊत बोलले म्हणून होत नाही तर शेवटी मी पक्ष प्रमुख आहे. निर्णय घेण्याचा अधिकार माझ्याकडे आहे, असे उत्तर उद्धव ठाकरे यांनी दिले. यावर समाधान न झाल्याने चतुर्वेदी बैठकीतून निघून गेल्याचे समजतंय.
वातावरण गंभीर
दरम्यान, प्रियांका चतुर्वेदी यांना पक्षाने ६ वर्ष संधी दिली. मात्र त्यांनी काय काम केले, त्यांचा काय उपयोग झाला? असा सवाल मराठवाडयातील खासदाराने उद्धव ठाकरे यांना विचारला. त्यामुळे वादाची ठिणगी आणखीनच भडकली. या प्रश्नामुळे वातावरण अधिकच गंभीर झाले.
या केवळ अफवा
या मुद्दयावरून संजय राऊत यांनी सांगितले की, अशा प्रकारचा कुठलाही वाद झालेला नाही. या केवळ अफवा आहेत. मी शिवसेनेचा मुख्य प्रवक्ता आहे. शिव सेनेच्या स्थापनेपासून मी सोबत आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी माझा नेता म्हणून निवड केली आहे. मी नेहमीच शिवसेनेच्या भल्याची भूमिका मांडत असतो. माझे आणि उद्धव ठाकरे यांचे संबंध कसे आहेत हे साऱ्या जगाला माहीत आहेत. दरम्यान, माझे य चतुर्वेदी यांच्यात बाचाबाची झाली, ही अफवा आहे. त्यावर कुणीही विश्वास ठेऊ नये, अशी भूमिका राऊत यांनी मांडली .










