INDW vs SLW T20I : भारत आणि श्रीलंका महिला क्रिकेट संघांमध्ये इथे खेळल्या गेलेल्या टी-20 मालिकेतील पाचव्या सामन्यात भारतीय महिला संघानं श्रीलंकेचा 15 धावांनी पराभव केला. यासह, भारतीय महिला संघानं श्रीलंकेचा क्लीन स्वीप केला. भारतानं पाचही सामन्यांमध्ये श्रीलंकेचा एकतर्फी पराभव केला. गेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतानं 7 विकेट गमावून 175 धावा केल्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ फक्त 160 धावाच करू शकला. पहिल्यांदाच भारतीय महिला संघानं टी-20 मध्ये श्रीलंकेचा क्लीन स्वीप केला आहे.
हरमनप्रीत कौरची कर्णधारपदाची खेळी :
सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर, टीम इंडियाची सामन्यात चांगली सुरुवात झाली नाही. मालिकेत आतापर्यंत एक उत्तम फलंदाज राहिलेली शेफाली वर्मा या सामन्यात चांगली कामगिरी करू शकली नाही, तिनं 6 चेंडूत 5 धावा केल्या. पदार्पण करणारी जी कमलिनी 12 चेंडूत 12 धावा करून बाद झाली. हरलीन देओलनेही 13 धावा केल्या. भारतीय डाव कोसळल्यानंतर, कर्णधार हरमनप्रीत कौरने संघाला सावरलं आणि आव्हानात्मक मजल मारुन दिली. (INDW vs SLW T20I)
श्रीलंकेची फलंदाजी अपयशी :
श्रीलंकेची सुरुवातही चांगली झाली नाही. कर्णधार चामारी अटापट्टू स्वस्तात बाद झाली. तिने पाच चेंडूत दोन धावा केल्या. तथापि, हसिनी आणि इमिषाने नंतर दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करत डाव सावरला. इमिषाने 38 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. अमनजोत कौरने तिच्या पहिल्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर इमिषा दुलानीला बाद करून भारताला दुसरे यश मिळवून दिले. इमिषाने 39 चेंडूत आठ चौकारांसह 50 धावा केल्या. इमिषा आणि हसिनीने दुसऱ्या विकेटसाठी 79 धावांची भागीदारी केली. त्यांच्या बाद झाल्यानंतर श्रीलंकेचा डाव डळमळीत झाला. शेवटी, 20 षटकांनंतर श्रीलंकेला फक्त 160 धावा करता आल्या.











