Team India Beats Pakistan : 2026 च्या टी-20 विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यात एक हाय-व्होल्टेज सामना खेळला गेला. टीम इंडियानं पाकिस्तानचा सहज 61 धावांनी पराभव केला. या शानदार विजयासह टीम इंडिया सुपर-8 साठी पात्र ठरली. या सामन्यात भारताला प्रथम फलंदाजी करण्याची संधी देण्यात आली. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियानं 7 विकेट्स गमावून 175 धावा केल्या. टी-20 विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध भारताची ही सर्वोच्च धावसंख्या आहे. प्रत्युत्तरात पाकिस्तानला 18 षटकांत फक्त 114 धावा करता आल्या.
इशान किशनची दमदार खेळी :
प्रथम फलंदाजी करणाऱ्या टीम इंडियाची या सामन्यात चांगली सुरुवात झाली नाही. अभिषेक शर्मा पहिल्याच षटकात धाव न घेता पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याच्या बाद झाल्यानंतर तिलक वर्मा आणि इशान किशननं डावाची सूत्रे हाती घेतली. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 87 धावांची भागीदारी केली. इशाननं 40 चेंडूत 77 धावांची तुफानी खेळी केली. इशान बाद झाल्यानंतर टीम इंडियाचा डाव डळमळीत झाला. सूर्यकुमार यादवनं 32 धावा केल्या, तर तिलक वर्मानं 25 आणि शिवम दुबेनं 27 धावांचं योगदान दिलं. इशानच्या अर्धशतकामुळं टीम इंडिया 175 धावांपर्यंत पोहोचू शकली. पाकिस्तानकडून सॅम अयुबनं सर्वाधिक 3 बळी घेतले.
पाकिस्तानी फलंदाज सपशेल अपयशी :
भारतानं दिलेल्या 176 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवात निराशाजनक झाली. साहिबजादा फरहान एकही धाव न करता बाद झाला. सॅम अयुबनं 6, सलमान आघा यांनी 4 आणि बाबर आझम यांनी 5 धावा केल्या. 13 धावांवर 3 विकेट गमावल्यानंतर पाकिस्तान अडचणीत सापडला. त्यानंतर बाबर आझम 34 धावांवर बाद झाल्यानं पाकिस्तानला चौथा धक्का बसला. त्यानंतर उस्मान खान आणि शादाब खान यांनी पाचव्या विकेटसाठी 39 धावांची भागीदारी केली. उस्माननं 34 चेंडूत 44 धावा केल्या, तर शादाब खाननं 15 चेंडूत 14 धावा केल्या. फक्त चार पाकिस्तानी फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले. शेवटच्या षटकांमध्ये शाहीन आफ्रिदीनं 23 धावांची खेळी करत पराभवाचं अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला. टीम इंडियाकडून हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले.
टी-20 विश्वचषकात टीम इंडियाचा दबदबा कायम :
टी-20 विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत नऊ सामने झाले आहेत. त्यापैकी आठ सामने टीम इंडियानं जिंकले आहेत, तर एकदा पाकिस्ताननं जिंकला आहे. या विजयासह टीम इंडियानं या फॉरमॅटमध्ये पाकिस्तानविरुद्ध आपलं वर्चस्व कायम ठेवलं आहे.












