Rohit Pawar | आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी प्रफुल्ल पटेल (Praful Patel) आणि सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अजित पवारांकडे असलेले सर्व अधिकार आणि राष्ट्रवादी पक्षाचा ताबा प्रफुल्ल पटेलांकडे देण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप रोहित पवारांनी केला आहे. रोहित पवारांनी केलेल्या या आरोपांनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
हेही वाचा – अशोक खरातचा एन्काऊंटर होणार? विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा, म्हणाले, पुरावे नष्ट करण्यासाठी…
नेमकं काय म्हणाले रोहित पवार?
रोहित पवार म्हणाले की, अजित पवार यांचा 28 तारखेला अपघात झाला की घातपात झाला याचा आम्ही शोध घेत आहोत. पण त्यानंतर दोन दिवसांमध्ये पियुष गोयल यांनी मोठं वक्तव्य केलं होतं. प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले, असं विधान पियुष गोयल करतात. नंतर गोयल आपण हे चुकून बोललं असल्याचं सांगतात. जर क्रमवारी पाहिली तर सुनील तटकरे, प्रफुल पटेल आणि इतर नेत्यांमध्ये या गोष्टी अगोदरच ठरल्या होत्या. पक्षाचा ताबा घेण्याबाबत आधीच ठरलं होतं, त्यामुळे पटेल, तटकरेंचा हेतू नेमका काय होता? याचा तपास झाला पाहिजे.
रोहित पवारांनी सुनेत्रा पवारांना दिला मोलाचा सल्ला
जेव्हा अजित दादा होते तेव्हा ते कोणताही निर्णय घेताना पक्षाच्या कार्यकर्त्यांचं आणि आमदारांचं ऐकत होते. पण सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांचं ते ऐकत नव्हते. त्यामुळे या दोघांना सगळा पक्ष आपल्या ताब्यात यावा असं वाटत होतं. त्यानंतर अजित पवारांचा अपघात होतो हे संशयास्पद आहे. त्यामुळे मला सुनेत्रा काकींना सांगायचं आहे की, राजकारण लय वंगाळ होत चाललं आहे. त्यामुळे आजुबाजूला जी लोकं आहेत त्यांची काळजी घ्यावी लागेल, असं म्हणत रोहित पवारांनी सुनेत्रा पवारांना खास सल्ला दिला.
पुढे ते म्हणाले की, अजित पवारांना जाऊन फक्त 18 दिवस झाले होते. त्यानंतर 16 फेब्रुवारीला तीन नेत्यांनी सुनेत्रा काकींना आणि पार्थ पवारांना काहीही न सांगता थेट निवडणूक आयोगाला पत्र दिलं होतं. या तीन नेत्यांमध्ये सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल होते. तर अजित पवारांकडे असणारे सर्व अधिकार आणि पक्षाची संपूर्ण ताकद प्रफुल्ल पटेलांकडे पत्राच्या माध्यमातून दिली गेली. त्यानंतर याबाबत सुनेत्रा पवारांना कळालं असावं, त्यामुळेच त्यांनी राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर ताबडतोब पत्रव्यवहार केला, असंही रोहित पवार म्हणाले.
अजितदादा जेव्हा जिवंत होते तेव्हा त्यांच्या घराबाहेर काळी जादू केली जात होती. कदाचित नाशिकचा भोंदूबाबाच्या माध्यमातून दादांच्या घराबाहेर ही काळी जादू किंवा अघोरी पूजा करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. पक्षावर आपला कंट्रोल यावा यासाठी ती पूजा किंवा काळी जादू करण्यात आली होती का? कारण दादांच्या घराबाहेर काळी जादू करण्याचा प्रकार झाल्यानंतर 28 तारखेला अजितदादांचा अपघाता झाला की घातपात झाला? याचा शोध आम्ही घेत आहोतच, असं रोहित पवार म्हणाले.
अजितदादांच्या घराबाहेर काळी जादू करण्यामध्ये कोण कोण त्या ठिकाणी अडकलेलं आहे? अजितदादांची ताकद जावी आणि त्यांच्याकडे ती ताकद यावी यासाठी कोणी कोणी असा प्रकार करण्याचा प्रयत्न केला आहे? यामागे काय हेतू होता का? अशा शंकाही रोहित पवारांनी उपस्थित केल्या आहेत.












