Boat Capsized in Yamuna River : मथुरामधून सध्या एक दुःखद बातमी समोर येत आहे. मथुरामधील वृंदावनमध्ये यमुना नदीत स्टीमर पलटल्यानं एक मोठा अपघात झाला असून, त्यामुळं सर्वत्र घबराट पसरली आहे. प्राथमिक माहितीनुसार, स्टीमरमध्ये अंदाजे 25 लोक प्रवास करत होते, त्यापैकी सुमारे डझनभर लोक अजूनही बेपत्ता आहेत. या अपघातामुळं संपूर्ण परिसरात घबराट पसरली आहे.
हेही वाचा : “VSR च्या मालकाला तो बडा नेता भेटला…”, रोहित पवारांचे स्फोटक
नेमकं काय घडलं :
हा अपघात शृंगार घाटाजवळ झाला, जिथं स्टीमरचा तोल अचानक गेला आणि ती नदीत उलटली. प्रत्यक्षदर्शींच्या मते, अपघात इतका अचानक झाला की लोकांना सावरण्याची संधीही मिळाली नाही. अपघातानंतर एकच गोंधळ उडाला. नदीत पडलेले लोक आपला जीव वाचवण्यासाठी धडपडताना दिसले.
बेपत्ता लोकांना शोधण्यासाठी शोधमोहीम :
अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली आणि अनेकांना वाचवण्याचा प्रयत्न केला. जिल्हाधिकारी सी. पी. सिंग यांच्या माहितीनुसार, या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे, तर इतर अनेक जण बेपत्ता आहेत. माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासकीय पथकं तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. मदत आणि बचाव कार्यासाठी डायव्हर्स तैनात करण्यात आले आहेत. बेपत्ता लोकांना लवकरात लवकर शोधण्यासाठी नदीत सतत शोधमोहीम सुरु आहे.
प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून :
वृंदावनमधील शृंगार घाटाजवळ बचावकार्य सुरु आहे. एनडीआरएफ आणि स्थानिक डायव्हिंग पथकं पाण्यात शोध घेत आहेत. जोपर्यंत सर्व लोक सापडत नाहीत, तोपर्यंत हे शोधकार्य सुरु राहील, असे प्रशासनाने म्हटले आहे. घटनास्थळी मोठी गर्दी जमली आहे. कुटुंबीय आपल्या प्रियजनांची आतुरतेनं वाट पाहत आहेत. या अपघातामुळं संपूर्ण परिसरात चिंता आणि दुःखाचं वातावरण आहे. सध्या, मदत आणि बचावकार्य सुरु असून, प्रशासन परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून आहे. बेपत्ता झालेले लोक लवकरच सापडतील अशी आशा आहे.






