Baramti Byelection | मागील काही दिवसांपासून बारामती विधानसभा पोटनिवडणुकीवरून (Baramati Byelection) मोठा गोंधळ निर्माण झाला होता. एकिकडे महायुतीकडून बारामती पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न सुरू होते. तर दुसरीकडे काँग्रेस (Congress) पक्षाने आपला उमेदवार रणांगणात उतरवत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार नसल्याचं स्पष्ट झालं होतं. अशातच आता बारामती पोटनिवडणूकीत मोठा ट्विस्ट आला आहे.
हेही वाचा – बीड सुन्न! केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघातात मृत्यू, प्रशासनात हळहळ
आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी महायुतीच्या नेत्यांसोबतच महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही मोठे प्रयत्न सुरू केले होते. आज आमदार रोहित पवार यांनी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेत त्यांना ही पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची मागणी केली होती. तर दुसरीकडे या निवडणुकासाठी उभे राहिलेले काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे हे शरद पवार यांच्या भेटीला गेले होते. सोबतच सुनेत्रा पवार यांनीही काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांना फोन करत ही पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची मागणी केली होती. या सर्व घडामोडींनंतर आता काँग्रेसने अखेर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
विजय वडेट्टीवारांनी नेमका काय केला खुलासा?
दोन्ही राष्ट्रावादींनी केलेल्या प्रयत्नानंतर काँग्रेसने आपला अंतिम निर्णय जाहीर केला आहे. बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसने उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. याबाबतची माहिती काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.
विजय वडेट्टीवार हे माध्यमांशी बोलताना म्हणाले की, आज आमच्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांना अनेक नेत्यांचे फोन आले होते. यामध्ये सत्ताधारी पक्षातील नेते आणि उपमुख्यमंत्री ज्या आत्ता निवडणूक लढत आहेत सुनेत्रा पवार यांचे फोन आले होते. बारामतीतील सर्व परिस्थिती पाहता, तेथील लोकांची भावना लक्षात घेता या निवडणुकीतून पुढे जाणं थांबवावं, अशी भूमिका आम्हाला दिसली. यावर आम्हा सर्वांचे एकमत झाले आहे. तसेच आमच्या निर्णयापूर्वी आम्ही दिल्लीच्या हायकमांडशी चर्चा करून त्यांचा आदेश आल्यानंतर भरलेला फॉर्म हा विड्रॉ करण्याची प्रक्रिया सुरू करू, असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं.
काँग्रेसची नेमकी भूमिका काय?
दरम्यान, सध्या काँग्रेसचा अधिकृत निर्णय झालेला नाहीये. विजय वडेट्टीवार यांनी परस्पर या पोटनिवडणुकीतून माघार घेण्याची घोषणा केली आहे. मात्र, अद्याप काँग्रेस हायकमांडचा याबाबत निर्णय आलेला नाहीये. सध्या या पोटनिवडणुकीबाबत मल्लिकार्जुन खर्गे आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची चर्चा सुरू आहे. त्यामुळे आता काँग्रेस अंतिम निर्णय काय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच वडेट्टीवारांनी केलेल्या घोषणेनुसार सुनेत्रा पवारांचा मार्ग मोकळा झाल्याचं म्हटलं जात आहे.












