RajyaSabha Election 2026 | सध्या राजकीय वर्तुळात सर्वांचे लक्ष लागले आहे ते राज्यसभा निवडणुकांवरती (Rajyasabha Election 2026). या निवडणुकीसाठी महाराष्ट्रातून सात उमेदवार जाणार आहेत. विधानसभेतील संख्याबळ पाहता महायुतीचे 6 उमेदवार राज्यसभेवर निवडून जातील. तर एक जागा महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मिळणार आहे. महाविकास आघाडीकडून शरद पवारांच्या (Sharad Pawar) नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. तर भाजपाकडून रामदास आठवले (Ramdas Athawale), विनोद तावडे (Vinod Tawde), रामदास वडकुते (Ramdas Vadkute), माया इवनाते (Maya Ivanate) यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील संख्याबळानुसार भाजपचे 4 उमेदवार हमखास निवडून येऊ शकतात. त्यानुसार भाजपने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. तर दुसरीकडे एकनाथ शिंदेच्या (Eknath Shinde) शिवसेनेची एक जागा आहे. त्यामुळे ते कोणाला उमेदवारी देणार? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. तर आता ते नाव समोर आलं असून शिंदें गटातील बड्या नेत्याला मोठा धक्का बसला आहे.
हेही वाचा – मोठी बातमी! अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; VSR कंपनीचा मालक रोहित सिंह लवकरच…
एकनाथ शिंदेंनी कोणत्या महिला उमेदवाराला दिली संधी?
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून राज्यसभेवर राहुल शेवाळे (Rahul Shewale) जातील, असं म्हटलं जात होतं. पण अचानक एकनाथ शिंदेंनी शेवाळेंना मोठा धक्का देत महिला उमेदवाराच्या नावाची घोषणा केली आहे. शिंदेंनी शेवाळे यांच्या ऐवजी ज्योती वाघमारे (Jyoti Waghmare) यांना राज्यसभेसाठी संधी दिली आहे. त्यामुळे आज ज्योती वाघमारे एकनाथ शिंदेंसमवेत विधानभवनात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दाखल झाल्या आहेत.
राहुल शेवाळे हे एकनाथ शिंदेंचे निकटवर्तीय आणि विश्वासू मानले जातात. तसेच राहुल शेवाळेंचा नगरसेवक, शाखाप्रमुख ते खासदार असा राजकीय प्रवास राहिला आहे. शेवाळे यांनी स्थायी समिती अध्यक्ष, नगरसेवक अशी अनेक पदे भूषवली आहेत. तर 2022 साली शिवसेनेत जेव्हा फूट पडली तेव्हा राहुल शेवाळेंनी एकनाथ शिंदेंची साथ देण्याचा निर्णय घेतला. राहुल शेवाळे हे एक अनुभवी नेते म्हणून ओळखले जातात. पण, आज राज्यसभेसाठी ज्योती वाघमारेंची निवड केल्याने शेवाळेंना मोठा धक्का बसला आहे.
निवडणूक आयोगाने 10 राज्यांमधील 37 राज्यसभेच्या जागांसाठी निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. या 37 जागांसाठी 16 मार्च रोजी निवडणुका होणार आहेत. रिक्त जागांपैकी 12 जागांवर एनडीए आहे, तर 25 जागांवर विरोधी पक्षांचा समावेश आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक (7) जागा आहेत, त्यानंतर तामिळनाडू (6) आणि पश्चिम बंगाल आणि बिहार (प्रत्येकी 5) आहेत. राज्यसभेसाठी उद्या म्हणजे 5 मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे.











