Ind Vs SA 1st Test Match Series : भारत आणि दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघातील दोन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना आज (22 नोव्हेंबर) गुवाहाटी येथील बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर सुरु झाला आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी खेळ संपला तेव्हा दक्षिण आफ्रिकेनं त्यांच्या पहिल्या डावात 6 बाद 247 धावा केल्या. सेनुरन मुथुस्वामी 25 आणि काइल व्हेरेन 1 धावांवर नाबाद होते. तर गोलंदाजीत भारताकडून कुलदीप यादवनं सर्वाधिक तीन बळी घेतले आहेत.
हेही वाचा – भारताला मिळाला 38वा कसोटी कर्णधार; वाचा आतापर्यंतच्या कर्णधारांची यादी
आफ्रिकेची दमदार सुरुवात
दक्षिण आफ्रिकेनं पहिल्या डावात दमदार सुरुवात केली. सलामीवीर एडेन मार्कराम आणि रायन रिकेल्टन यांनी अर्धशतकी भागीदारी केली. ही भागीदारी जलद गोलंदाज जसप्रीत बुमराहनं मोडली, ज्यानं मार्कराम (38) ला बाद केलं. त्यानंतर, टी-ब्रेकनंतर लगेचच कुलदीप यादवनं रिकेल्टन (35) ला बाद केलं. त्यानंतर टेम्बा बावुमा आणि ट्रिस्टन स्टब्स यांनी तिसऱ्या विकेटसाठी 84 धावांची भागीदारी केली. बावुमाला रवींद्र जडेजानं 41 धावांवर बाद केलं. टेम्बा बावुमानंतर, ट्रिस्टन स्टब्स (49 धावा) लाही कुलदीप यादवनं बाद केलं. कुलदीपनं वियान मुल्डरलाही आउट केलं, ज्यामुळं दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या 201/5 झाली. पहिल्या दिवसाच्या खेळात दक्षिण आफ्रिकेचा सहावा बळी टोनी डी झोर्झीचा होता, जो 28 धावांवर मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला.
An evenly matched opening day in the second #INDvSA Test in Guwahati 🏏#WTC27 📝: https://t.co/5B1PcNj4kk pic.twitter.com/vjP2wE3oqz
— ICC (@ICC) November 22, 2025
भारत-आफ्रिका सामन्यात प्लेइंग 11 मध्ये किती बदल? :
भारतीय संघानं या सामन्यासाठी शेवटच्या प्लेइंग 11 मध्ये दोन बदल केले, तर दक्षिण आफ्रिकेच्या संघानं एक बदल केला. शुभमन गिलची जागा नितीश रेड्डीनं घेतली. तर अक्षर पटेलला संघातून वगळण्यात आलं आणि साई सुदर्शनला संघात समाविष्ट करण्यात आलं. दक्षिण आफ्रिकेच्या संघानंही एक बदल केला. कॉर्बिन बॉशची जागा फिरकी गोलंदाज सेनुरन मुथुस्वामीनं घेतली. परिणामी, आफ्रिकन संघानं तीन फिरकी गोलंदाजांना मैदानात उतरवलं, ज्यात आधीच केशव महाराज आणि सायमन हार्मर होते.
गुवाहाटीमध्ये एका नवीन परंपरेची सुरुवात
गुवाहाटी स्टेडियमवर हा पहिला कसोटी सामना आहे. यात टॉस सकाळी 8:30 वाजता झाला आणि सामना सकाळी 9 वाजता सुरु झाला. पाचही दिवसांचं पहिलं सत्र सकाळी 9 ते 11 वाजेपर्यंत असेल. यानंतर 20 मिनिटांचा चहापानाचा ब्रेक असेल. दुसरं सत्र सकाळी 11:20 ते दुपारी 1:20 पर्यंत असेल. दुसऱ्या सत्राच्या समाप्तीनंतर 40 मिनिटांचा जेवणाचा ब्रेक असेल. त्यानंतर शेवटचं सत्र दुपारी 2 ते 4 वाजेपर्यंत असेल. जर दिलेल्या वेळेत पूर्ण षटकं पूर्ण झाली नाहीत तर खेळ अर्धा तास वाढवला जाईल, म्हणजेच सामना दुपारी 4:30 पर्यंत चालू शकतो.






