सुंदर कुसाळकर
Hailstorm Hits Indapur-Bawda Region: पुण्याच्या इंदापूरातील बावडा व परिसरामध्ये गारपिटीमुळे नुकसान झालेल्या फळबागा, शेती पिकांची माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची कन्या आणि पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या अंकिता पाटील ठाकरे यांनी 21 मार्च रोजी पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला व त्यांना दिलासा दिला.
इंदापूर तालुका व परिसरात वादळी वारे व विजेच्या कडकडाटासह गुरुवारी 19 मार्च रोजी सायंकाळी सुमारे अर्धा तास अवकाळी पावसाने इंदापूर तालुक्यासह बावडा परिसरात जोरदार गारपीट झाली होती.
या गारपिटीमुळे शेतातील काढणी चालु असलेल्या गहू, हरभरा आदी रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच डाळिंब, द्राक्ष, पेरू, केळी आदी फळबागांनाही या गारपिटीचा फटका बसला आहे. तसेच डाळिंब, पेरू फळबागा सध्या फुलोऱ्याच्या अवस्थेत असून, गारपिटीमुळे फळबागांमध्ये फुलगळ मोठ्या प्रमाणावरती हानी झाली आहे.
त्याचबरोबर काढणीच्या अवस्थेत असलेल्या द्राक्ष बागांमध्ये द्राक्षांना तडे जाऊन मोठ्या प्रमाणावरती मणी गळून पडले आहेत. शिवाय कडवळ, मकवान आदी चारा पिकांचेही वादळी वाऱ्याने जमिनीवर लोळल्याने नुकसान झाल्याचे अंकिता पाटील ठाकरे यांनी सांगितले.
हेही वाचा: स्टार प्लसच्या ‘या’ मालिकांनी जिंकले प्रेक्षकांचे मन; ‘तारक मेहता’ने टॉप-5 मध्ये जोरदार केली एन्ट्री
बावडा परिसरात
बावडा परिसरामध्ये ठिकठिकाणी या नुकसानग्रस्त फळबागा, शेती पिकांना अंकिता पाटील ठाकरे यांनी भेट दिली. या पाहणीनंतर गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचे अंकिता पाटील ठाकरे यांनी सांगितले. इंदापूर तालुका व परिसरातील नुकसानग्रस्त फळबागा व शेती पिकांचे शासनाने तातडीने पंचनामे पूर्ण करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणे बाबत कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचेकडे पाठपुरावा करणार असल्याचे अंकिता पाटील ठाकरे यांनी सांगितले.
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे
परंतु यापूर्वीही झालेल्या पावसाने अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसानही झालेलं होतं त्याचीही पूर्णता मदत शेतकऱ्याला शासनाकडून अद्याप मिळाली नसल्याचं शेतकरी सांगत आहे. यावर कृषिमंत्री दत्तात्रय भरणे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून शेतकऱ्यांना मदत दिली जाणार असंही सांगितलं गेले.
मोठी घोषणा
महाराष्ट्र राज्यातील पात्र शेतकऱ्यांना ३० जून २०२६ पूर्वी कर्जमाफीचा थेट लाभ मिळणार असल्याची मोठी घोषणा कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली आहे. अवकाळी पावसाने शेतकऱ्याचे मात्र पूर्णतः कंबरड मोडल्याचं चित्र पाहायला मिळत आहे, या झालेल्या नुकसानाने शेतकरी मात्र पूर्णता हवालदिल झाल्याचं चित्र संपूर्ण महाराष्ट्रात पाहायला मिळत असून शेतकरी आता मदतीची अपेक्षा सरकारला करत आहे.












