indian share bazar : पश्चिमआशियातील युद्धाचे ढग गडद होताच सोमवारी भारतीय शेअर बाजार (Indian stock market) गडगडला. त्यामुळे इराण-इस्रायल-अमेरिका संघर्षाच्या वृत्ताने गुंतवणूकदारांमध्ये (Investor) घबराट आहे. तर बाजारावर भीतीचे काळे सावट पसरले आहे.
हे ही वाचा: भारतीय सैन्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; श्रीलंकेत बांधला चौथा पूल
निर्देशांक कोसळला
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स १८३७ अंकांनी कोसळला आणि ७२,६९६ वर बंद झाला, तर निफ्टी ६०२ अंकांच्या घसरणीसह २२,५१३ वर थांबला. या महाभयंकर पडझडीमुळे गुंतवणूकदारांची एकाच दिवसात तब्बल १५ लाख कोटी रुपयांची मालमत्ता खाक झाली आहे.
ॲडव्हान्स-डिक्लाईन रेश्यो
आजची घसरण किती व्यापक होती, हे ‘ॲडव्हान्स-डिक्लाईन’ रेश्योवरून (Advance-decline ratio) स्पष्ट होते. नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर हा रेश्यो १:१४ असा होता; याचाच अर्थ बाजारात प्रत्येक १ वाढणाऱ्या शेअरमागे १४ शेअर्समध्ये पडझड पाहायला मिळाली.
बँकिंग क्षेत्र भुईसपाट : निफ्टी बँक १९८९ अंकांनी तुटून ५१,४३८ वर बंद झाला.
मिडकॅपला फटका : मिडकॅप इंडेक्समध्येही २,१३८ अंकांची मोठी घसरण होऊन तो ५२,७१८ वर आला.
सुरक्षित गुंतवणूकही धोक्यात : आश्चर्यकारक बाब म्हणजे, संकटाच्या काळात सुरक्षित मानले जाणारे सोने आणि चांदी देखील आज ७ ते ११ टक्क्यांनी कोसळले. यामुळे या वर्षातील सोन्या-चांदीचा संपूर्ण परतावा शून्यावर आला आहे.
सध्याचा बाजार हा केवळ ‘सेन्टीमेंट्स’वर चालतोय
युद्ध सुरू झाल्यापासून आतापर्यंत गुंतवणूकदारांचे तब्बल ५० लाख कोटी रुपये पाण्यात गेले आहेत. सध्याचा बाजार हा केवळ ‘सेन्टीमेंट्स’वर चालत असून तांत्रिक निकष बाजूला पडले आहेत.
जोपर्यंत पश्चिम आशियातून तणाव निवळल्याचे ठोस संकेत मिळत नाहीत, तोपर्यंत बाजारात मोठी खरेदी करणे जोखमीचे ठरेल. किरकोळ गुंतवणूकदारांनी अशा वेळी घाबरून विक्री करण्यापेक्षा दर्जेदार शेअर्समध्ये संयम बाळगणे आवश्यक आहे.






